नगर : जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, कोल्हार, लोणी या भागात शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात खरीप पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडले आहेत. या संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेतली आहेत. मात्र, ढगाळ वातावरणामुळे या पिकांवरदेखील कीड पडण्याचा धोका डिसेंबर, जानेवारी महिन्यात सातत्याने निर्माण झाला होता. त्यातच आता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांतील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा हरभरा, गहू अशा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
नगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस
जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, कोल्हार, लोणी या भागात शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2020, 4:00 am