नगर : आंतरजिल्हा बदलीत पदस्थापना देताना अन्याय करण्यात आल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या संबंधित प्राथमिक शिक्षकांनी केली आहे. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी शिक्षकांनी कुटुंबीयांसह जिल्हा परिषदेच्या आवारात सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या सर्व शिक्षकांना समुपदेशनाने किंवा पसंती क्रमानुसार पदस्थापना द्यावी, २३ जुलै २०१८ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, दिव्यांग शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी पदस्थापना बदलून द्यावी, आपसी बदलीची संधी मिळावी आदी मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत. या उपोषणाला अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहोकले यांनी पाठिंबा दिला. या उपोषणात शिक्षक आंतरजिल्हा बदली कृती समितीचे अध्यक्ष महेश पन्हाळे, गणेश रोकडे, रुपेश शिंदे, संतोष भैरी, संतोष माघाडे, वैभव लाटणे, बाळासाहेब दातीर, लता गायकवाड, राजेंद्र बनकर, मनीषा मिसाळ, वंदना तिखे, ज्योती गाडेकर, सचिन कदम, बळीराम कदम आदी शिक्षक सहभागी झाले आहेत.
..............