गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे स्पष्टीकरण
म. टा. प्रतिनिधी, नगर
'नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही बऱ्याच दिवसांपासून लोकांची मागणी आहे. त्याला माझा विरोध असण्याचे कारण नाही. पण पाणी व रोजगारासारखे मोठे प्रश्न जिल्ह्यासमोर आहेत. ते सोडविण्यासाठी अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विखे यांनी पाणी नियोजनासंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 'जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांची अपुरी कामे पूर्ण करणे, रोजगार संधी उपलब्ध करणे, हे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य असणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यात असणारे कुकडीचे सर्कल कार्यालय नगरला आणले जावे, यासाठी मी राज्य सरकारला लेखी पत्र दिले आहे. कुकडीचे ८० टक्के लाभक्षेत्र नगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे नियोजनाच्या दृष्टीने कुकडीचे सर्कल कार्यालय नगरला असणे गरजेचे असून तशी मागणी सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने असंख्य लोक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. नगर जिल्ह्यातील अनेकजण भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहे. जिल्ह्यात अकोले तालुक्यातून महाजनादेश यात्रा सुरू होईल. ही यात्रा आल्यानंतर अनेकजण भाजपमध्ये येऊ शकतात,' असेही सूचक भाष्य त्यांनी केले.
....
जिल्ह्यातच सक्षम व्यक्ती
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमधून लढण्याच्या तयारी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना कोणाचेही नाव न घेता विखे म्हणाले, 'निवडणुकीमध्ये कोणाला कुठे उभे राहायचे, हा ज्याच्या-त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. मात्र, नगर जिल्ह्यामध्ये सक्षम मंडळी आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे नेतृत्व येथील जनता स्वीकारेल, असे वाटत नाही.'