अ‍ॅपशहर

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

नगर जिल्ह्याच्या काही भागात रविवारी मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. मान्सून रविवारी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागात दाखल झाला आहे. नगर जिल्ह्याचा बराचसा भागही मान्सूनने व्यापला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 24 Jun 2019, 5:52 am
एका दिवसामध्ये ४६५ मिलिमीटर पावसाची नोंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rain lashes in entire district
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस


म. टा. प्रतिनिधी, नगर

नगर जिल्ह्याच्या काही भागात रविवारी मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. मान्सून रविवारी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागात दाखल झाला आहे. नगर जिल्ह्याचा बराचसा भागही मान्सूनने व्यापला आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात शनिवारी रात्री सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. एका दिवसामध्ये ४६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यातील पूर्व व मध्य भागाच्या पट्ट्यातील ब्राम्हणगाव, टाकळी, धारणगांव, म्हसोबावाडी, निमगांव, पारेगांव मुसळधार पाऊस झाला. या तालुक्यात शनिवारी रात्री तब्बल १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यामध्ये मागील वर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे नागरिक दुष्काळाचा सामना करीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी तब्बल ८६० टँकर सुरू करण्यात आले आहेत. साधारणपणे नगर जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीला व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडत असल्याच्या नोंदी जिल्हा प्रशासनाकडे आहेत. यंदा मात्र अवकाळी पावसाने दांडी मारली होती. जिल्ह्यामध्ये १ जून ते १८ जून याकालावधीत १४ तालुक्यांमध्ये मिळून केवळ ३९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती

शनिवारी मात्र जिल्ह्यातील सर्वच चौदा तालुक्यांत सर्वदूर पावसाची नोंद झाली आहे. या एका दिवसात ४६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. शनिवारी कोपरगाव तालुक्यात १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, राहुरीत ४७ मिलिमीटर, नेवासात ७० मिलिमीटर, पाथर्डीत ६० मिलिमीटर, श्रीगोंदात ४७ मिलिमीटर, अकोले तालुक्यात ८ मिलिमीटर, संगमनेर ८ मिलिमीटर, श्रीरामपूर १४ मिलिमीटर, राहाता तालुक्यात २० मिलिमीटर, नगर २ मिलिमीटर, शेवगाव १९ मिलिमीटर, पारनेर १३ मिलिमीटर, कर्जत ५ मिलिमीटर व जामखेड तालुक्यात २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, शनिवारी रात्री साडेनऊ ते साडेबारा वाजेपर्यंत कोपरगांवच्या ब्राम्हणगांव, टाकळी, धारणगांव म्हसोबावाडी मुसळधार पावसाने हाहाकार उडविला. या पावसामुळे जवळपास तीनशे घरांचे नुकसान झाले आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे व त्यांच्या महसुल यंत्रणेने पाहणी करून पंचनामे करण्यांचे काम सुरू केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज