‘रयत विद्यापीठ’ आश्वासन ‘चुनावी जुमला’ ठरू नये
अजित पवारांचा भाजपला टोला; डिजिटल बोर्ड शिक्षणावरही आक्षेपम टा...
अजित पवारांचा भाजपला टोला; डिजिटल बोर्ड शिक्षणावरही आक्षेप
म. टा. प्रतिनिधी, नगर
'रयत शिक्षण संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेले आश्वासन 'चुनावी जुमला' ठरू नये', असा शाब्दिक टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला. 'या केंद्रीय मंत्र्यांनी शाळांतून काळ्या फळ्याऐवजी डिजिटल बोर्डवर शिक्षण देण्याची घोषणा केली असली तरी असे फळे बदलून काय उपयोग?, त्यात काय शिकवणार ते सांगा, शिवाय डिजिटल बोर्डमुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या', असा सल्लाही त्यांनी दिला.
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात येथील उत्तर विभागाच्या वतीने बुधवारी येथे झाली. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात मागील ४ ऑक्टोबरला साताऱ्यात झाली. या वेळी केंद्रीय मंत्री जावडेकर उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यावर पवारांनी त्यांचे नाव न घेता येथे टीका केली. यानिमित्त सहकार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संस्थेतील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू व शिक्षकांचा पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी 'रयत'चे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, सचिव भाऊसाहेब कराळे, उत्तर विभागाचे अध्यक्ष दादा कळमकर, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप व राहुल जगताप, माजी आमदार बबनराव पाचपुते, दादा पाटील शेळके व नरेंद्र घुले, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे आदी उपस्थित होते.
'शिक्षण संस्थांना कटोरा घेऊन काय फिरताय, भिक मागू नका, असे राज्याचे शिक्षण मंत्री म्हणतात, तेव्हा मागणारे स्वतःसाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या व शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी मागतात, याचे भान त्यांनी ठेवणे आवश्यक असल्याचे' सांगून पवार म्हणाले, 'अवघ्या महिना-पंधरा दिवसात होणारे शिक्षक समायोजन या मंत्र्यांच्या काळात चार-चार वर्षे सुरूच आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शैक्षणिक संस्थांच्या अडचणी होत आहेत. राजकारण अन्य कोणत्याही क्षेत्रात करा, पण शिक्षण क्षेत्रात करू नका, असेच माझे त्यांना सांगणे असेल,' असेही पवारांनी आवर्जून स्पष्ट केले.
'रयतचे शैक्षणिक काम राज्याचाच नव्हे तर देशाचा गौरव वाढवणारे आहे,' अशा शब्दात गौरव करून पवार म्हणाले, 'साडे चार लाख विद्यार्थी व साडेतेरा हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या या संस्थेतून केवळ ज्ञानदान व ज्ञानप्रसाराचेच काम फक्त आता अपेक्षित नाही तर विविध प्रकारचे कौशल्य असलेली पिढी घडवण्याचे काम गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना फुले-शाहू-आंबेडकरांची पुस्तके वाटली पाहिजे. पण सध्याचे सरकार मागील चार वर्षांपासून वेगळीच पुस्तके वाटत आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.
कळमकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. निमसे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्वावलंबन, कमवा व शिका, स्वाध्याय, स्वाभिमान व स्वातंत्र्य या पंचसूत्रीचा गौरव केला. यापुढे कृषी आधारित शिक्षण व जॉब मार्केटच्या दृष्टीने संस्थेने विद्यार्थी घडवावेत, असे आवाहनही केले. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. विभागीय अधिकारी नागपुरे यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मीनाताई जगधने, अरुण कडू, आशुतोष काळे, शौकत तांबोळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, डॉ. बापूसाहेब कांडेकर, सुजाता पोखरकर आदी उपस्थित होते.