अ‍ॅपशहर

खासदार गांधींसह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

भाजपचे खासदार दिलीप गांधी, त्यांचा मुलगा नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यासह चौघांविरुद्ध अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.

Maharashtra Times 25 Feb 2018, 3:50 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ransom charge against four mps including mps
खासदार गांधींसह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल


भाजपचे खासदार दिलीप गांधी, त्यांचा मुलगा नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यासह चौघांविरुद्ध अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भूषण गोवर्धन बिहाणी यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपींमध्ये गांधी पिता-पुत्रांसह पवन प्रकाश गांधी (रा. नगर) व सचिन दिलीप गायकवाड (रा. श्रीगोंदा) यांचाही समावेश आहे.

खासदार गांधी यांनी बिहाणी यांच्या शोरूममधून जानेवारी २०१५ मध्ये गाडी खरेदी केली होती. या गाडीत दोष असल्याच्या तक्रारी गांधी यांनी केल्या. त्यानंतर २९ सप्टेंबर २०१५ रोजी सुवेंद्र गांधी व त्याच्या साथीदारांनी शोरूममधील वर्क्स मॅनेजर असलेले अजय रसाळ व सेल्स मॅनेजर सुशील ओसवाल यांचे अपहरण करून त्यांना एमआयडीसी येथील अग्नीशमन दलाजवळ नेले व भूषण बिहाणी यांना तेथे बोलावून घेतले. या तिघांना निर्जनस्थळी नेऊन तेथे मारहाण करीत बंदुकीचा धाकाने सचिन गायकवाड याच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे १६ लाख ७४ हजार रुपये जबरदस्तीने जमा करायला लावले; तसेच बिहाणी यांच्याकडून जबरदस्तीने नोटरी करून घेत त्यांच्याकडे उसनवारी दाखविली व या बेकायदा नोटरीच्या आधारे खंडणी मागण्यास सुरुवात केली. बिहाणी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता गांधी व त्यांच्या साथीदारांनी यांनी शोरूममधून नवीन दहा फोर्ड इकोस्पोर्ट गाड्या जबरदस्तीने घेऊन गेले. त्या बदल्यात खंडणीची मागणी केली. नंतरच्या काळात १० पैकी ९ कार त्यांनी परत केल्या व एक कार खासदार गांधी यांच्या मुलीसाठी ठेवून घेतली. त्यापोटी पाच लाख रुपये त्यांनी जमा केले. खासदार गांधी यांनी पदाचा गैरवापर करून बिहाणी यांच्या विरोधात आरटीओ, प्राप्तिकर व विक्रीकर विभागाकडे तक्रारी करून त्यांना त्रास दिला.

बिहाणी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालय व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. याबाबत पोलिसांनी चौकशी करून काहीच तथ्य नसल्याचा अहवाल दिला होता. अखेर बिहाणी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद खंडपीठाने गांधी पिता-पुत्रांसह चौघांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज