अ‍ॅपशहर

स्वाइन फ्लूचा धोका वाढला

जिल्ह्यात स्वाइन फ्लू वेगाने फैलावत चालला असून या आजारामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात असली तरी आजाराचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.

Maharashtra Times 3 Sep 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम risk of swine flu increased
स्वाइन फ्लूचा धोका वाढला

जिल्ह्यात स्वाइन फ्लू वेगाने फैलावत चालला असून या आजारामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात असली तरी आजाराचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. जानेवारी २०१७ पासून या आजाराने ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील महिन्यात मृतांची संख्या २६ इतकी होती. त्यात आता आणखी पाच जणांची भर पडली आहे. तसेच या सात महिन्यांत तब्बल ८० जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ६२३ स्वाइन फ्लूचे संशयित आढळले असून त्यांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देऊन उपचार केले आहेत. दरम्यान, नगर शहरातही या आजाराने तीन जण दगावले असून आजाराचा धोका वाढला आहे.

जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील स्वाइन फ्लू ग्रस्तांच्या यादीत जिल्हा पहिल्या चारमध्ये आला आहे. या आजाराची लक्षणे दिसताच संबंधितास तत्काळ टॅमी फ्लूच्या गोळ्या सुरू केल्या जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६२३ संशयित रुग्ण आढळले आहेत. ८० जणांना स्वाइन फ्लूचे निदान झाले आहे. या सर्वांवर उपचार केले आहेत. या आजाराने आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक ९ जणांचा मृत्यू संगमनेर तालुक्यात झाला आहे. त्या खालोखाल राहता ७, श्रीरामपूर ४, कोपरगाव ४, नेवासा ४, नगर १, अकोले ३, कर्जत १, आणि पारनेर तालुक्यात ३ असे ३६ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लू या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सर्वत्र जनजागृती केली जात आहे. खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेतल्या जात असल्या तरी आजाराचे प्रमाण कमी झालेले नाही.

गणेशोत्सवात दक्षतेचे आवाहन

स्वाइन फ्लू या आजाराचा विषाणू हवेवाटे वेगाने पसरतो. जिल्ह्यात सध्या गणेशोत्सव सुरू असून नागरिक देखावे पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या परिसरात गर्दी वाढली आहे. या गर्दीमध्ये नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शिंकताना हात रुमालाचा वापर करणे, हात स्वच्छ धुण्याची सवय लावणे, कुठेही थुंकणे टाळणे तसेच धुम्रपान केल्याने शरिराची प्रतिकार शक्ती कमी होत असल्याने धूम्रपान टाळणे महत्वाचे आहे. दमा, कॅन्सर, किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांनाही स्वाइन फ्लू होण्याची शक्यता जास्त असते. याबाबत जनजागृती केली जात असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

माहिती कळवण्याकडे दुर्लक्ष

सरकारी दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णांच्या स्वॅबची तपासणी सरकारी प्रयोगशाळांत केली जाते. खासगी दवाखान्यातील रुग्णांचे स्वॅब सरकारने परवानगी दिलेल्या खासगी प्रयोगशाळेत तपासले जातात. खासगी दवाखान्यातील रुग्णांची माहिती सरकारी यंत्रणांना देणे अपेक्षित असले तरी माहिती कळवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यातील रुग्णांची माहिती सरकारी वैद्यकिय अधिकाऱ्यांना होत नाही. माहितीतही तफावत असल्याचे दिसून येते. खासगी प्रयोगशाळेतील तपासण्याही महागड्या असतात. सरकारी प्रयोगशाळेतील तपासणी मात्र मोफत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज