निधी परत जाण्याची सभापतींना भीती
नगर : 'अमृत योजनेतून शहरात होणाऱ्या भूमिगत ड्रेनेज योजनेची कामे झाली नसल्याने शहरातील ४३ रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे रखडली आहेत. ही कामे विविध सरकारी योजनांच्या निधीमधून प्रस्तावित असल्याने ती मार्गी न लागल्यास कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाऊ शकतो,' अशी भीती महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या १३२ कोटींच्या निधीतून अमृत योजनेंतर्गत भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. पण या भुयारी गटार योजनेतील पाइप टाकण्याच्या कामासह मनपाद्वारे मागील १० वर्षांपासून काम सुरू असलेल्या 'फेज-२' पाणी योजनेचे पाइप टाकल्याशिवाय रस्त्यांची कामे सुरू करू नयेत, असे सरकारचे निर्देश आहेत. भुयारी गटार व 'फेज-२' पाणी योजनेचे पाइप टाकण्याचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रस्तावित असलेली रस्त्यांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत. पण ती झाली नाही, तर त्यांच्यासाठीचा निधी सरकारकडे परत जाऊ शकतो,' असे म्हणणे शेख यांचे आहे.
शहर व उपनगर परिसरात मंजूर असलेली सुमारे ४३ रस्त्यांची कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे ही कामे रखडली असली तरी 'भुयारी गटार'च्या प्रकल्प अहवालामध्ये संबंधित रस्त्यांच्या डागडुजीची तरतूद करण्यात आली आहे. भुयारी गटारसाठी खोदाई केल्या जाणाऱ्या ठिकाणी रस्ता दुरुस्ती या तरतुदीतून करता येणार आहे. तसेच भुयारी गटारीचे काम रस्त्याच्या कडेने केले जाणार आहे. त्यामुळे रस्त्याची कामे सुरू करता येणे शक्य आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावी, अशी मागणी शेख यांची आहे. कार्यारंभ आदेश देऊनही या रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्यातील ३२ रस्ता कामे मध्यवर्ती शहरातील आहेत. मध्य शहर व उपनगरात सध्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पायी चालणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे ही कामे तत्काळ सुरू होणे आवश्यक आहे, असे म्हणणे शेख यांचे आहे.