विद्यार्थ्यांची पत्र लिहून विनवणी; माळीवाडा कचरा रॅम्पचा मांडला त्रास
म. टा. प्रतिनिधी, नगर
'कचऱ्याच्या दुर्गंधीने आम्हाला उलट्या होतात..डासांचा त्रास होतो. काहींना तर डेंगीचा आजारही झाला आहे...त्यामुळे आजारी पडण्यापासून आम्हाला वाचवा हो'...अशी आर्त विनवणी करणारे पत्र साडेचारशेवर शालेय विद्यार्थ्यांनी महापालिकेचे आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना लिहिले आहे. माळीवाड्यातील सविता रमेश फिरोदिया या शाळेजवळ असलेल्या महापालिकेच्या कचरा रॅम्पमुळे होत असलेला त्रास विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे मांडला असून आतातरी प्रशासनाचे डोळे उघडतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.
जुन्या महापालिकेजवळील मनपाच्या गॅरेज दुरुस्ती केंद्रातील वाहने धुवून स्वच्छ करण्याच्या सिमेंट रॅम्पचा वापर करून छोट्या घंटागाड्यांतील कचरा मोठ्या ट्रॅक्टर व डंपरमध्ये टाकण्याचे काम केले जाते. दिवसभर सुरू असलेल्या या कामामुळे परिसरात दुर्गंधी असते. वाहनात भरताना कचरा खाली पडतो तसेच वाहने जा-ये करतानाही रस्त्याने कचरा पसरतो. या कचरा रॅम्पच्या शेजारीच शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया शाळा आहे. येथे बालवाडी ते सातवीपर्यंतचे वर्ग असून, सुमारे ११०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय या शाळेच्या समोरच्या बाजूला भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया, रुपीबाई बोरा तसेच महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत. यातील हजारो विद्यार्थ्यांना कचरा दुर्गंधीचा त्रास होतो. मागील सात-आठ वर्षांपासूनचा हा त्रास दूर होत नसल्याने महापौर सुरेखा कदम व विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनीही संबंधित कचरा रॅम्प हटवण्याची मागणी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे केली आहे. पण संबंधित कामाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी तब्बल साडेचारशेवर शालेय विद्यार्थ्यांनीच मनपा आयुक्तांच्या नावे पत्र लिहून आजारी पडण्यापासून वाचवण्याची विनंती केल्याने कचरा रॅम्पचे स्थलांतर आता ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.
स्वच्छता पंधरवड्याचा उपक्रम
सविता रमेश फिरोदिया शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. शाळेतील विद्यार्थी स्वच्छता उपक्रम राबवत आहेत. या मोहिमेत शाळेशेजारील कचरा रॅम्प हटवला तरी परिसरात स्वच्छता साधली जाणार असल्याने या प्रश्नाची तीव्रता महापालिका प्रशासनासमोर मांडण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना पत्र लिहिण्यास सुचवले. त्यानुसार ४५०वर विद्यार्थ्यांनी अशी पत्रे लिहिली व कचरा रॅम्पमुळे होणाऱ्या त्रासाची मांडणी त्यात केली. ही पत्रे घेऊन विद्यार्थी महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना भेटले व पत्राचा गठ्ठाच त्यांच्या हवाली केला. या वेळी मुख्याध्यापिका योगिता गांधी, विनोदकुमार कटारिया, भाऊराव डोळस, निलेशकुमार आंबेकर, नीता लांडगे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
सुचनेची अंमलबजावणी नाही
कचऱ्याच्या त्रासामुळे विद्यार्थी आजारी पडत आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनास निवेदने देताना मोर्चे व आंदोलनेही केली आहेत. परंतु उपाय योजना काहीही झाल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनीही या कचरा रॅम्पची पाहणी करून ते हलविण्याबाबत सूचनाही केल्या आहेत. परंतु अजूनही कार्यवाही नाही, असे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कचरा संकलनासाठी शहराच्या बाहेर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. लवकरच यावर निर्णय होऊन माळीवाड्यातील कचरा संकलन केंद्र हलविण्यात येईल, असे आश्वासन उपायुक्त डॉ. पठारे यांनी या वेळी दिले.
--