भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉ. सुजय विखे यांचे आवाहन
म. टा. वृत्तसेवा शेवगाव
'स्व. बाळासाहेब विखे यांच्यामुळे ज्यांना या मतदारसंघात अस्तित्व होते, त्या नेत्यांना आता आमदार होण्याचे डोहाळे लागले आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरणाऱ्या या मंडळींना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या. आमदार मोनिका राजळे यांना मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा,' असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
बोधेगाव येथे मुंगी व लाडजळगाव गणातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नगरसेवक अरुण मुंडे, बापूसाहेब भोसले, रमेश केसभट आदी उपस्थित होते.
पंधरा दिवसांपूर्वी बोधेगाव येथे भाजपतील काही ज्येष्ठ नेत्यांनी मेळावा घेत, मोनिका राजळे हटावचा नारा देत राजळे यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा खासदार डॉ. विखे यांनी आपल्या भाषणातून खरपूस समाचार घेतला. विखे म्हणाले, 'लोकसभेला काहींनी आपल्या विरोधात काम केले. येत्या विधानसभेला आता त्यांचा हिशोब चुकता करत जिल्ह्यातील बारा ही जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत. या गटातील जिल्हा परिषद सदस्यांनी येथील पाणी योजनेसाठी नेमके काय योगदान दिले, याचा आता जनतेने विचार करावा. सामाजिक कामे करताना स्वतः झळ खावी लागते. त्यांनी कधी स्वतःच्या खिशातील दोन रुपये तरी खर्च केले का? फक्त पैसा कमावण्याचा उद्योग मात्र, त्यांनी जोरात केला. या भागातील सर्व पाणी योजना केवळ वीज बिलाअभावी बंद ठेवल्याने पाण्याच्या नळातून फक्त हवाच निघत आहे. आता त्यांचीच हवा काढावी लागणार आहे. ज्यांनी लोकांचे पैसे खात लोकांच्याच भावनेशी खेळ केला, त्यांना आता उचलून जेलमध्ये टाकले पाहिजे. आज त्यांच्याबरोबर थांबायला कोणी तयार नाही, दुसरीकडे आमदार मोनिका राजळे आपल्या सर्वांच्या सुख-दुःखात समरस झाल्या आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांनी विकासकामे केली आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे व बाळासाहेब विखे यांचे आशीर्वाद राजळे यांच्यासह आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. येणारी विधानसभा निवडणूक एकट्या मोनिकाताई राजळे यांची नसून ती आपल्या सर्वांची आहे. मागील वेळेस राजळे या ५३ हजार मताधिक्याने निवडून आल्या, या वेळी त्यांना ६५ हजारांच्या फरकाने निवडून आणायचे आहे. विधानसभा निवडणुक संपल्यानंतर आपण गावोगावी मुक्काम करून प्रत्येक गावातील समस्या सोडविणार आहोत. पुढील २५ वर्षांत निवडणुकीच्या प्रचाराला येण्याची गरज राहणार नाही, एवढी कामे आपल्याला करायची असल्याचे शेवटी डॉ. सुजय विखे म्हणाले. या वेळी राजळे म्हणाल्या की, 'गेल्या पाच वर्षांत आपल्या कार्यकाळात कोणी दुखावले जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत शेवगाव-पाथर्डीला समान न्याय देण्याचे काम केले. आपल्याकडे आलेला प्रत्येक रुपया वाडी-वस्तीवर खर्च केला आहे. मतदारसंघात अकराशे कोटी रुपयांचा निधी आणून विविध विकासकामे मार्गी लावली. सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या. कोणताही माणूस शंभर टक्के यशस्वी नसतो. मात्र, आता उरलेली विकासकामे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून मार्गी लावू. निवडणुकीचे शिवधनुष्य एकटीने उचलणे अवघड असले, तरी तुमच्या साथीने ते आपण उचलू. ही निवडणूक तुमच्या आमच्या अस्तित्वाची असल्याने कोणीही रुसवे-फुगवे धरू नयेत, असे आवाहन शेवटी मोनिका राजळे यांनी केले.