म. टा. प्रतिनिधी, नगर
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होताच ज्युनिअर कॉलेजांमध्ये गुरुवारी प्रवेश अर्ज घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. कॉलेजांमध्ये अर्ज जमा करण्यासाठी १७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली असली, तरी शनिवारी (१६ जून) रमजान ईद व रविवार (१७ जून) अशी सलग दोन दिवस सुट्टी आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जातील माहिती तत्काळ भरून तो कॉलेजांमध्ये जमा करणे पसंत केले. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र प्रवेश प्रक्रिया शांततेत सुरू झाली असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.
अकरावीसाठी सायन्स व कॉमर्स या दोन्ही शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. त्यामुळे शहरातील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पेमराज सारडा कॉलेज यांनी सायन्स व कॉमर्स या दोन्ही शाखांचे प्रवेश अर्ज कॉलेजच्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत. या अर्जांची प्रिंट काढून त्याला आवश्यक कागदपत्र जोडून तो कॉलेजमध्ये जमा करावा लागणार आहे, तर रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर कॉलेज, यांनी मात्र विद्यार्थ्यांना आर्टस्, कॉमर्स व सायन्स या तिन्ही शाखांचे अर्ज कॉलेजमध्येच उपलब्ध करून दिलेत. हे अर्ज भरून विद्यार्थ्यांना कॉलेजांमध्ये जमा करावे लागणार आहेत. त्यासाठी १७ जूनपर्यंत मुदत असली, तरी सलग दोन दिवस सुट्टी आल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज जमा करण्यासाठी प्रत्यक्षात १५ जूनपर्यंतच मुदत मिळणार आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये अर्ज घेतल्यानंतर तो तेथेच भरून देण्यास विद्यार्थ्यांचे प्राधान्य होते.
दरम्यान, अर्ज भरून देऊन कॉलेजमध्ये जमा केल्यानंतर प्राप्त सर्व अर्जांचे संगणकीकरण १८ जून रोजी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी १९ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीवर आक्षेप घेण्यासाठी २० व २१ जून अशी दोन दिवस मुदत देण्यात आली असून, विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी २२ जुलै रोजी प्रसिद्ध होईल. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्र जमा करून अकरावीला प्रवेश घेता येईल.
………………………........
प्रवेश अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
- दहावीच्या गुणपत्रकाची छायांकित प्रत (ऑनलाइन निकालाची)
- शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत
- जातीचा दाखला छायांकित प्रत (आवश्यकता असल्यास)
- कला व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्याचे प्रमाणपत्राचा छायांकित प्रत (आवश्यकता असल्यास)
……………………………........
'आर्टस्'ला अल्प प्रतिसाद
आर्टस् शाखेचे अर्ज घेऊन जाण्यास विद्यार्थ्यांचा खूपच कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कॉलेजांमध्ये उपलब्ध असणाऱ्या जागांपेक्षा आर्टस् शाखेसाठी कमी अर्ज आल्यास विद्यार्थ्यांना आर्टस् शाखेला थेट प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे; तसेच काही कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांना आर्टस् शाखेनंतर करिअरच्या असणाऱ्या संधीबाबत सांगून त्यांचे प्रबोधनही करण्यात येत आहे.
..............