म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान मुंबई येथे होणार आहे. संघटनेचे हे पहिलेच राज्यव्यापी अधिवेशन आहे. या अधिवेशनासाठी शिक्षकांना तीन दिवसांची विशेष रजा मंजूर करण्यात आली आहे. या अधिवेशनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षक आमदार कपिल पाटील, संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत. जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना जाहीर करावी व अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी. राज्य सरकारच्या विविध विभागांतील खासगीकरण व कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पूर्ववत करावी, माध्यमिक शाळांतील अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णकालीन ग्रंथपाल करावे, अनुकंपा तत्वावरील भरती तातडीने सुरू करावी या मागण्यांवर आधिवेशनात चर्चा होणार आहे. या आधिवेशनास जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, हनुमंत रायकर, संभाजी पवार, संपत वाळुंज, सुदाम दिघे, सुर्यकांत बांदल, राजाराम गिरवे, सतीश जामदार, शरद कारंडे, विलास माने, नवनाथ घोरपडे, महादेव कोठारे, अशोक अन्नाड, संतोष मगर, प्रकाश तनपुरे, काशिनाथ मते, जितेंद्र आरु, महेश पाडेकर, किशोर डोंगरे, कैलास रहाणे, संदीप वर्पे, संभाजी चौधरी, संजय तमनर आदींनी केले आहे.