श्रीरामपूरमधील मौलाना आझाद चौकात दोन दिवसांपासून आंदोलन सुरू
म. टा. प्रतिनिधी, नगर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीच्या शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या धर्तीवर बुधवारी सायंकाळपासून श्रीरामपूरमध्येही बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे. गुरुवारी दिवसभर हे आंदोलन सुरू होते. अनेक वक्त्यांनी भाषणे करत सीएए, एनपीआर, एनआरसी कायद्याला विरोध सुरू केला आहे. संविधान बचाव समितीकडून हे आंदोलन करण्यात येत असून, त्यात वेगवेगळ्या धर्मांचे लोक सहभागी झाले आहेत. महिलांचाही सहभाग मोठा आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक व प्रस्तावित नागरिकत्व रजिस्टर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूरमधील मौलाना आझाद चौकात हे आंदोलन होत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी महासंघाचे माजी महासचिव व ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे (आइसा) संदीप सौरव यांचे भाषण झाले. सौरव म्हणाले, 'राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) हे राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टरचे (एनआरसी) पहिले पाऊल असून, देशातील युवा शक्तीने सरकारचा हा डाव हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांनी विद्यार्थ्यांना समर्थन देऊन ताकद वाढवावी. धर्माच्या आधारावर नागरिकत्व स्वीकारले अथवा नाकारले जाणार आहे. हा कॉम्रेड भगतसिंगांच्या कल्पनेतील भारत नाही. याला सर्वप्रथम देशातील विद्यापीठातील विद्यार्थी वर्गाने विरोध केला. त्याचा राग मनात धरून सरकारने त्यांच्यावर सूड उगवायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या पोलिसांद्वारे किंवा पोलिसांच्या संरक्षणात गुंडांद्वारे विद्यापीठांत घुसून विद्यार्थ्यांवर हल्ले केले जात आहेत. जे विद्यार्थी पोलिसांच्या हल्ल्याला बळी पडले आहेत, ते भविष्यात कधीही पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेवू शकणार नाहीत. सरकारी यंत्रणा व पोलिसांच्या या वर्तनामुळे देशाच्या भावी नागरिकांचा व सामान्य नागरिकांचा सरकारच्या महत्त्वाच्या अंगांवरील विश्वास उडाला आहे. हा विश्वास दृढ करणे हे सरकारचे काम असून, सरकार नेमके त्याच्या उलट काम करत आहे.'
गृहमंत्री अमित शहांवरही त्यांनी टीका केली. 'नागरिकत्व कायद्यातील दुरुस्तीमुळे सरकार पाकिस्तान, बांगलादेश व अफगणिस्तानमधील ज्यांना नागरिकत्व देऊ इच्छित आहे, त्यांना जुन्या कायद्यानुसारही नागरिकत्व देता येऊ शकत होते. जुन्या व दुरुस्त केलेल्या कायद्यात फरक एवढाच आहे, की मुस्लिमांना त्यातून आता वगळता येता येणार आहे. कागदपत्राअभावी 'एनआरसी'मधून वगळले जाऊ शकणाऱ्या हिंदूंनी काळजी करू नये. त्यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मदतीने नागरिकत्व पुन्हा बहाल केले जाईल, असे गृहमंत्री म्हणतात; परंतु 'एनआरसी'चे निकष जाहीर करायला ते तयार नाहीत. केवळ अमित शहांच्या लहरीसाठी आज देशाचे नागरिक असणाऱ्यांनी कागदाच्या तुकड्यांअभावी नागरिकत्व गमावून पुन्हा नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांच्या दयेवर अवलंबून का राहावे?,' असा सवालही त्यांनी केला. या वेळी संविधान बचाव समितीचे सदस्य अहमद जहागीरदार, मुजफ्फर शेख, अंजुमभाई शेख, साजिद मिरझा, हाजी मुख्तारभाई शहा, जीवन सुरुडे, नागेश सावंत, तिलक डुंगरवाल, धनंजय कानगुडे, अशोक दिवे आदी उपस्थित होते.
............
हल्ल्याचा अनुभव सांगितला
या आंदोलनात जेएनयू विद्यार्थी संघाच्या माजी अध्यक्षा गीता कुमारी व जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थी नेत्या चंदा यादव उपस्थित होत्या. चंदा यादव यांनी जामिया विद्यापीठात घुसून पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा अनुभव सांगितला. देशात नागरी स्वातंत्र्याचा संकोच होत असून, त्याचा बचाव करण्यासाठी नागरिकांनीच आता रस्त्यावर येणे आवश्यक असल्याचे आवाहन यादव यांनी केले.
...........
ओळ
'सीएए'विरोधात श्रीरामपूरमधील मौलाना आझाद चौकात सुरू असलेल्या आंदोलनात बोलताना 'जेएनयू' विद्यार्थी महासंघाचे माजी महासचिव संदीप सौरव.
..........