अ‍ॅपशहर

नव्या शाळेसाठी ओलांडावी लागते नदी

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून तेथील मुलांना अन्य शाळेत पाठविण्याच्या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील ४९ शाळांना बसला असून, बहुतांश शाळेची वाट ही घरापासून खडतर व असुरक्षित असल्यामुळे पालकही मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे.

संदीप कुलकर्णी | Maharashtra Times 13 Dec 2017, 3:00 am
नगर:कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून तेथील मुलांना अन्य शाळेत पाठविण्याच्या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील ४९ शाळांना बसला असून, बहुतांश शाळेची वाट ही घरापासून खडतर व असुरक्षित असल्यामुळे पालकही मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम students cross river for new school
नव्या शाळेसाठी ओलांडावी लागते नदी


अकोला, नगर, जामखेड तालुक्यातील बंद करण्यात आलेल्या काही शाळांतील विद्यार्थ्यांना समायोजित करण्यात आलेल्या शाळेमध्ये जाण्यासाठी डोंगर, नद्यांचा अडथळा पार करावा लागतोय. नगर तालुक्यातील बारेमळा येथील जिल्हा परिषद शाळा ही सारोळा नदीच्या कडेला आहे. या शाळेला भेट दिली असता येथे पहिली ते चौथीपर्यंत नऊ विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेपासून जुना सारोळा कासार किंवा खडकी येथील शाळा अडीच किलोमीटर अंतरावर आहे. परंतु या दोन्ही शाळांमध्ये जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना काळेवाडी येथील शाळेमध्ये समायोजित करण्यात आले. परंतु या शाळेचे अंतरही तीन किलोमीटर असून तेथे जाण्यासाठी खराब व निर्मनुष्य रस्ता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांना पालक पाठवण्यास तयार नाहीत. येथील पालकांनी तर थेट शिक्षण संचालकांना शाळाबंद करू नये, यासाठी पत्र पाठवले आहे. या पत्राचे उत्तर येईपर्यंत आहे, त्याच ठिकाणी शाळा भरवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय. अकोले तालुक्यातील सर्व शाळा या अतिदुर्गम भागातील आहे. या शाळेतील मुलांना दुसरी पर्यायी शाळा नाही. तसेच अतिदुर्गम भागातील शाळा बंद करू नये, असा नियम देखील आहे. परंतु त्यानंतरही येथील शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे. जामखेड तालुक्यातील मुसलमानवाडी शाळेतील १२ विद्यार्थ्यांना खामगाव येथील शाळेत पाठवण्यात आले आहे. सध्या विंचरणा नदीचे मोठ्या प्रमाणात पाणी वाहात असल्याने या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरुन नदी ओलांडून शाळेत जावे लागते. नदी ओलांडून मुलांना शाळेत पाठवण्यास पालक तयार नाहीत.

पटसंख्या वाढली पण....

गुणवत्ता नसल्यामुळे शाळांची पटसंख्या खालावत असून ० ते १० पटसंख्येपर्यंतच्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे सरकारच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्षात काही शाळांमध्ये पटसंख्या दहापेक्षा जास्त आहे. नगर तालुक्यातील बंद करण्यात आलेल्या जिल्हा परिषद दत्तनगर शाळेची पटसंख्या सध्या १८ होती. परंतु मागील दोन वर्षांच्या जुन्या अहवालाचा आधार घेऊन ती बंद करण्यात आली. आता येथील विद्यार्थ्यांना वाघमोडे वस्ती येथील शाळेमध्ये जावे लागते. या शाळेतील सर्व मुले सर्वांत प्रथम बंद झालेल्या शाळेत जमा होतात. त्यानंतर एकत्रितपणे वाघमोडे वस्ती येथील शाळेत जातात. पटसंख्या वाढली असल्यामुळे ही शाळा बंद न करण्याची विनंती पालकांनी केली होती. परंतु त्याची दखलही घेण्यात आली नाही. तर कर्जत तालुक्यातील सुद्रिकवस्ती या शाळेची विद्यार्थी संख्या १२ आहे. ऑनलाइन माहिती भरताना या शाळेची पटसंख्या नऊ होती. त्यानंतर ती वाढली असली तरीही शाळा बंद करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज