म. टा. प्रतिनिधी, नगर
वन विभागासह सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रीन आर्मीची सदस्य नोंदणी केली जात आहे. नगर जिल्ह्यातून सदस्य वाढत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३१ हजार २६० इतकी सदस्य नोंदणी झाली आहे. या योजनेस सुरुवातीपासूनच प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे संथ गतीने सदस्य नोंदणी होत आहे.
या दोन्ही विभागांना नोंदणी करणे शक्य होत नसल्याने या उपक्रमांत आता अन्य सरकारी विभागांना सहभागी करून घेण्यात आले आहे. वृक्षारोपणाचे काम या सरकारी कार्यालयांना आधीच दिले आहे. त्यानंतर आता हरित सेना नोंदणीची जबाबदारी या कार्यालयांना घ्यावी लागणार आहे. वन विभागाने सरकारी कार्यालयांना उद्दिष्टही ठरवून दिले आहे.
वन विभागाने पुढील तीन वर्षांत राज्यभरात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत लोकसहभाग आवश्यक असल्याने हरित सेना स्थापन करण्यात आली. सुरुवातीला या सेनेत सदस्य नोंदणी करण्याचे काम वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि वन विकास महामंडळाकडून केले जात होते. या मोहिमेत एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत निम्मेच काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात २ लाख ३१ हजार २६० सदस्य नोंदणी झाली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नगर जिल्ह्याची स्थिती चांगली आहे. बीड जिल्ह्यात ३ लाख ५८ हजार ३०३ सदस्य संख्या आहे, उस्मानाबाद ४ लाख २ हजार ९१९, लातूर ५ लाख १६ हजार १६२, नाशिक ३ लाख १० हजार ८६८, यवतमाळ २ लाख ६३ हजार ४५ आणि चंद्रपूरमध्ये २ लाख ७५ हजार ७९४ सदस्य संख्या असून हे सहा जिल्हे नगर जिल्ह्याच्या पुढे आहेत.