माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सूचना
म. टा. प्रतिनिधी, नगर
'करोनाविरुद्धच्या लढ्यात आपण सगळे एकजुटीने पुढे जात आहोत. अशा वेळी नकारात्मक सल्ले ऐकण्यापेक्षा सकारात्मक पावले टाका. त्यासाठी सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन करावी,' असा सल्ला माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
विखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला ही सूचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'आज करोनाच्या कठीण काळामध्ये राज्य सरकारने सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन केली पाहिजे. त्यामुळे या परिस्थितीशी सामना करण्यास मदत होईल; तसेच या लढ्यात आपण सगळे एकजुटीने पुढे जात आहोत. म्हणून नकारात्मक सल्ले ऐकण्यापेक्षा सकारात्मक पावले टाकावीत. सरकारने विविध क्षेत्रातील अनुभवी लोकांचा समावेश असलेली सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन करावी. या संकटात महाराष्ट्र राज्य या संकटात अधिक भरडले जात आहे. त्यामुळे अधिक तातडीने निर्णय होण्याची अपेक्षा आहे. यासाठी सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती काम करेल. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पत्राव्दारे आपण ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. या मागणीमागे आपला कोणताही पक्षीय अभिनिवेश नाही. एक नागरीक म्हणून ही मागणी आपण करीत आहोत. ठप्प झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी सर्वांनाच नवा विश्वास द्यायचा असेल, तर सर्वांना एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच उच्चाधिकार समितीमध्ये सगळ्याच क्षेत्रांमधील अनुभवी व्यक्ती, तज्ज्ञ आणि अभ्यासक यांचा समावेश करावा.'
............
अधिकाऱ्यांच्या आदेशावर प्रशासन
विखे पाटील यांनी म्हटले आहे की, 'मागील अनेक दिवसांपासून राज्य सरकार निर्णय घेत आहे; परंतु समन्वयाचा मोठा अभाव असल्यामुळे निर्णयांची अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या आदेशावर प्रशासन सुरू आहे. त्यामुळे प्रशासन आणि जनता यांच्यात कुठलाही संवाद राहिलेला नाही. सरकारने अधिक कठोर निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा.'
...........