शिक्षक पुरस्कारावरील बहिष्कार मागे
म. टा. प्रतिनिधी, नगर
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार कायमच उशिरा होत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत उशीर का होत आहे, याचे उत्तर शोधण्यासाठी शिक्षकांची पगार बिले तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ष २०१७-१८ व २०१८-१९ या काळातील पगार बिलांची तपासणी केली जाणार असून यामध्ये पगार बिले उशिरा दिली गेली आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकांनी मंगळवारी अतिरिक्त सीईओंची भेट घेतली.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार ऑनलाइन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या प्रणालीत अडचणी येत असल्याने शिक्षकांचे पगार सध्या ऑफलाइन होत आहेत. पगार दर महिन्याच्या एक तारखेस करण्याच्या सूचना असल्या तरी शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. राज्यात केवळ नगर जिल्ह्यातीलच शिक्षकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले होते. पगाराबाबत आवश्यक माहिती शाळांकडून वेळेवर पाठवली जात नसल्याने पगारास उशीर होत असल्याचा मुद्दाही या वेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे शाळांकडून पाठवल्या जाणाऱ्या या पगार बिलांचीच तपासणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागास देण्यात आल्या आहेत. या बिलांची तपासणी केल्यानंतर नेमका उशीर कुठे होत आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली. दरम्यान, शिक्षकांचा जून महिन्याचा पगार जमा झाला असून लवकरच जुलै महिन्याचाही पगार होणार आहे. त्यामुळे जिल्हा शिक्षक पुरस्कारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षकांनी मागे घेतला आहे.
पगार नेहमीच लेट
जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार नेहमीच उशिरा होतात. याबाबत संघटनांनी प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर येथून पगार वेळेवर करण्याचे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होत नाही. प्रशासनाच्या या धोरणावर शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. पगार वेळेवर होण्यासाठी संघटनांनी याआधीही अनेक उपाय प्रशासनास सुचवले आहेत. प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने पगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या वेळी मात्र शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे पगार ४ सप्टेंबरपर्यंत करावेत तसेच यापुढे प्रत्येक महिन्याचा पगार ५ तारखेच्या आत होण्यासाठी प्रक्रियेत सुसूत्रता आणावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. त्यावर प्रशासन दर महिन्यास वेळेवर पगार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.