पाथर्डी : मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत राहून जोपर्यंत सरकार आरक्षण देणार नाही तोपर्यंत आमचा लढा आम्ही चालूच ठेवणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख समन्वयक संजीव भोर यांनी दिला.
मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेली संवाद यात्रा शनिवारी (१७ नोव्हेंबर) शहरात आल्यानंतर तिचे नाईक चौकात स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना संजीव भोर म्हणाले की, 'मराठा समाजाला आरक्षणासह आमच्या वीस मागण्या आहेत. या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत. तोपर्यंत आमची लढाई चालूच राहणार आहे. मराठा समाजाला नोकरीत व शिक्षण क्षेत्रात आरक्षण मिळायला हवे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मराठा युवक व शेतकऱ्यांविरोधात जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते तत्काळ मागे घ्यावेत. आरक्षण दिल्यानंतर नोकर भरती सुरू करावी. महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असा कायदा करावा. अशी मागणी त्यांनी शेवटी केली. या वेळी नगरसेवक बंडू बोरुडे, माजी उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, डॉ. रामदास बर्डे, दिलीप बोरुडे, विजय बोरुडे, अनिल बोरुडे, परमेश्वर टकले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.