बोल्हेगावमध्ये तीन घरे फोडली; मारहाणीत एक जखमी
म. टा. प्रतिनिधी, नगर
नगर शहरातील उपनगरामध्ये रात्रीच्या वेळी घरात घुसून चोरी करण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर बोल्हेगाव भागातील निंबळक रोड येथील तीन घरांमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी एकाला मारहाण करून जखमी केले आहे.
या प्रकरणी जखमी श्रीकांत कानडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बुधवारी रात्री कानडे घरात एकटेच झोपले होते. त्यांच्या घरात चोरटे घुसले. चोरट्यांनी घरातील शोकेसचा दरवाजा उघडल्यानंतर कानडे यांना जाग आल्याने ते उठून बसले. त्याचवेळी तोंड बांधलेल्या एका चोरट्याने त्यांच्या तोंडावर लोखंडी रॉडने मारून जखमी केले. चोरट्यांनी शोकेसमधील दोन हजार रुपये, मोबाइल, घड्याळ चोरून नेले. चोरांनी घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्या घराच्या दरवाजाची बाहेरून कडी लावून घेतली. त्यामुळे जखमी कानडे यांना घराबाहेर येता आले नाही. त्यानंतर त्यांनी स्क्रू ड्राइव्हरने दरवाजाचे कडी काढून ते घराबाहेर आले. त्यांच्या घराशेजारी राहणारे राजू मल्हारी गुंजाळ यांच्या घरात घुसून चोरट्यांनी रोख रक्कम, मोबाइल चोरून नेला. तर अनिल महादू गायकवाड यांच्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे झुमके, मोबाइल चोरून नेला आहे. या तीनही घरातील सदस्य झोपलेले असताना घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी चोरी केली आहे. एकमेंकाच्या मदतीला कोणी येऊ नये म्हणून चोरीनंतर चोरट्यांनी तीन घरांच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या होत्या. गेल्या महिनाभरापासून घरफोड्यांचे गुन्हे सातत्याने शहरात होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भांडणातून रिक्षा जाळली
बोल्हेगाव येथे मागील भांडणाच्या कारणावरून घरासमोर उभी केलेली रिक्षा जाळण्याची घटना घडली. यासंबंधी तृप्ती कातोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील बाळासाहेब भाऊसाहेब कातोरे (रा. बोल्हेगाव) रिक्षा चालवितात. त्यांच्या शेजारी राहणारे शंकर बबन जारकड यांनी मागील भांडणाच्या कारणावरून रिक्षा पेटवून दिल्याची फिर्याद कातोरे यांनी दिली आहे. त्यानुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी जारकड व त्यांच्या साथीदारांनी सोनवणे कुटुंबीयांना मारहाण केली होती. त्यामध्ये तुषार सोनवणे, जनाबाई सोनवणे, प्रियंका सोनवणे यांना मारहाण केली होती. यामध्ये ते जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे घरी केवळ फिर्यादी कातोरे आणि त्यांच्या मावशी दोघीच होत्या. जारकड यांनी रात्री रिक्षाला आग लावल्याचे त्यांनी पाहिले. मात्र, घाबरल्यामुळे त्यांनी त्यावेळी काहीही प्रतिकार केला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शंकर बबन जारकड याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गस्तीसाठी गाड्याच मिळाल्याच नाही
शहरातील घरफोड्यांचे व इतर गुन्हे रोखण्यासाठी चोवीस तास गस्त घालण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला आहे. गस्तीसाठी खास चाळीस पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा आदेश देण्यात आला होता. गस्तीसाठी दुचाकी वाहनेही देण्यात येणार होती. परंतु या दुचाकी वाहनांना जीपीएस बसविणे, सायरन बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पोलिस स्टेशनला ही वाहनेच मिळाली नाहीत. त्यामुळे चोवीस तास गस्त घालण्याचा उपक्रम शहरात अद्याप सुरू होऊ शकलेला नाही.
...........
मटा भूमिका
प्रत्यक्ष कृती हवी
घरफोड्यांचे गुन्हे वाढले की, पोलिसांकडून विविध योजनांची घोषणा केली जाते. मात्र, या योजना प्रत्यक्षात येतच नाहीत. केवळ घोषणा ऐकून घटना थांबतील, असे पोलिसांना वाटत असावे का? पोलिसांकडे यंत्रणा अपुरी आहे, हे मान्य. मात्र उपलब्ध यंत्रणेचाही नियोजनबद्ध पद्धतीने प्रभावीपणे वापर केला जात नाही. गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करणे दूरच गुन्हे दाखल करून घेण्याचेही अनेकदा टाळले जाते. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढत जाऊन नागरिकांच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण होते. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व तपासासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, हे मान्य. मात्र, त्यासाठी पोलिस जनता सुसंवाद असायला हवा. केवळ घोषणांपेक्षा सर्वोतोपरी उपाय करणे गरजेचे आहे.