माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, नगर
पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास पोलिस करत असताना तो तपास उशिरा 'एनआयए'कडे देण्यात आलेला आहे. गुन्हा उशिरा तपासासाठी 'एनआयए'कडे दिल्याने आता 'एनआयए'ची विश्वासार्हता राहणार नाही. उलट कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न राज्याच्या पोलिसांकडे आहे. पोलिस प्रशासन घटनात्मक आहे. तर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) अलिकडेच स्थापन झालेली आहे. त्यामुळे राज्याच्या पोलिसांची विश्वासार्हता जास्त आहे" असे मत माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी व्यक्त केले.
खोपडे नगरमध्ये एका व्याख्यानाला आले होते. त्या वेळी एल्गार परिषद, भीमा कोरेगाव हिंसाचार तपासाबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भीमा कोरेगाव येथे हिंसा झाल्यानंतर मिलिंद एकबोटे व भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध चिंचवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शनिवारवाड्यात भरलेल्या एल्गार परिषदेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याची फिर्याद रामगुडे नावाच्या व्यक्तीने दाखल केली होती. वास्तविक एल्गार परिषदेच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा हा पोलिस किंवा राज्याच्या गुप्तचर विभागाने दाखल करायला हवा होता. फिर्याद दाखल करतानाच चूक झाल्याचे दिसून येत असल्याचे मत खोपडे यांनी व्यक्त केले. एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) देण्यात आला आहे. हा केंद्राला अधिकार आहे. परंतु, राज्याने 'एसआयटी' स्थापनेचा मुद्दा आल्यानंतर केंद्र सरकारने घाई करून 'एनआयए'कडे तपास दिला आहे. केंद्र सरकारला असे तपास 'एनआयए'कडे देता येतात. त्यात चूक काही नाही. परंतु, सुरुवातीला हा तपास द्यायला हवा होता. ज्या पद्धतीने तपास 'एनआयए'कडे देण्यात आला आहे, त्यातून अनेक संशय निर्माण झाले असून, त्यामुळे विश्वासार्हता राहत नाही. उलट राज्याची पोलिस यंत्रणा घटनेत आहे. 'एनआयए'ही संस्था अलिकडची आहे. घटनात्मक दृष्टीने विचार केल्यास राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यांच्या पोलिसांकडे आहे. एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार याचा संबंध लागत असेल, तर 'एनआयए' हिंसाचार गुन्ह्याचा तपास स्वतःकडे घेऊ शकते,' असे खोपडे म्हणाले.
'एसआयटी'मध्ये सचोटीचे अधिकारी हवेत
'आता राज्य व केंद्र सरकारची यंत्रणा असा समांतर तपास होणार आहे. त्यात राज्याने स्थापन केलेल्या 'एसआयटी'मध्ये सरकारने चांगले अधिकारी दिले पाहिजेत. त्यांनी सचोटीने तपास केला पाहिजे. आपल्याकडे असे चांगले अधिकारी आहेत,' असे माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे म्हणाले. तसेच 'एनआयए' व 'एसआयटी'च्या तपासात तफावती येऊ शकतात. या तफावतींमध्ये न्यायालयासमोर काय येते हे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
-