खंडपीठात येत्या २ मे रोजी होणार सुनावणी
म. टा. प्रतिनिधी, नगर
महापालिकेवर प्रशासक नियुक्तीसाठी येथील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी येत्या २ मे रोजी होणार आहे. या याचिकेतील प्रतिवादींपैकी कोणीही अद्याप म्हणणे सादर केले नसल्याने त्यासाठी २ मे पर्यंत न्यायालयाने मुदत दिली आहे.
नगर महापालिकेचा कारभार ढिसाळ झाल्याने या संस्थेवर प्रशासक नियुक्तीची मागणी करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठाने मागील १२ एप्रिल रोजी नियमित सुनावणीसाठी दाखल करून घेतली व या विषयाबाबत २४ एप्रिलपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिका आयुक्त, महापौर, नाशिक विभागीय आयुक्त व नगरचे पोलिस अधीक्षक यांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या या याचिकेच्या सुनावणीत राज्य सरकार व केंद्र सरकारच्या वतीने सरकारी वकील न्यायालयासमोर हजर झाले व त्यांनी वेळ कमी मिळाल्यामुळे लेखी म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांना एक आठवड्याची मुदत देऊन येत्या २ मे पर्यंत लेखी म्हणणे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या याचिकेतील सहाही प्रतिवादींपैकी कोणीही अद्याप म्हणणे सादर केलेले नाही. त्यामुळे येत्या २ मे रोजी सर्वांना महापालिकेवरील प्रशासक नियुक्तीबाबत भूमिका मांडावी लागणार आहे.
महापालिकेत घडलेला ३६ लाखांचा पथदिवे घोटाळा, याप्रकरणी पाच जणांचे झालेले निलंबन, फेज-२ पाणी योजनेचा उडालेला फज्जा, प्रशासकीय कामकाजातील शिस्तीचा अभाव, बोगस टेंडरचे प्रकार, अपात्र कर्मचारी नियुक्ती, शहरात सर्वत्र पसरलेली सार्वजनिक अस्वच्छता, कामांच्या फाइल्स गायब असणे, महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट, निवृत्तीवेतनधारकांसह अनेकांची थकलेली देणी आदी तब्बल २४ मुद्यांच्या आधारे महापालिकेवर प्रशासक नियुक्तीची मागणी करणारी ही जनहित याचिका आहे. याचिकेच्या प्राथमिक सुनावणीच्या वेळी न्यायमूर्तींच्या आदेशाने याचिकाकर्ते सुहासभाई मुळे यांनी स्वतः या याचिकेमागची भूमिका न्यायालयासमोर मांडली होती व त्याची दखल घेऊन न्यायालयाने या विषयावर नियमित सुनावणी घेण्याचे निश्चित केले व याचिकेतील मुद्यांबाबत म्हणणे मांडण्याच्या नोटिसा सहा प्रतिवादींना जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
धमकीची दखल
महापालिकेवर प्रशासक नियुक्तीची याचिका दाखल करणारे जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांना निनावी पत्राद्वारे धमकी आली असून, त्याची माहिती त्यांच्या वतीने मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात देण्यात आली. त्याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली. संबंधित निनावी पत्र व धमकी प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याबाबत तसेच मुळे यांच्यासाठी योग्य ते सुरक्षात्मक उपाय करण्याबाबत थेट नगरच्या पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधण्याचे तोंडी आदेश खंडपीठाने सरकारी वकिलांना दिल्याचे मुळे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
--