प्रा. शिंदेंची पवारांवर टीका; भाजपचा उद्या जिल्हा मेळावा
म. टा. प्रतिनिधी, नगर
'देशाचे नेतृत्व (शरद पवार) डॉ. सुजय विखेंना पाडण्यासाठी नगरला येणार असेल तर जिल्ह्यातील सामान्य जनताच त्यांना योग्य ते उत्तर निवडणुकीतून देईल,' असा विश्वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पवारांचे नाव न घेता रविवारी व्यक्त केला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२६ मार्च) सायंकाळी ४ वाजता नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्समध्ये जिल्हा भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
भाजपचे उमेदवार डॉ. विखे यांच्या प्रचार नियोजन समन्वयासाठी भाजप व शिवसेना नेत्यांची संयुक्त बैठक झाली. या वेळी प्रा. शिंदे यांनी दोन्ही काँग्रेस आघाडीवर टीका केली. 'विखेंपाठोपाठ मोहिते, राजेनिंबाळकर व अन्य अनेक जण भाजपमध्ये आले असल्याने काँग्रेस आघाडी गर्भगळीत होऊन मेटाकुटीस आली आहे. निवडणूक निकालानंतर ती पूर्ण हतबल होईल, तिच्यात दम राहणार नाही,' असा दावा त्यांनी केला. विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी तसेच भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले, नेवाशाचे बाळासाहेब मुरकुटे, पाथर्डी-शेवगावच्या मोनिका राजळे तसेच माजी आमदार अनिल राठोड, बबनराव पाचपुते, चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी आदी या बैठकीस उपस्थित होते.
रंगला माफीनामा
या बैठकीचे प्रास्ताविक करताना उमेदवार डॉ. विखे यांनी प्रारंभी स्थानिक भाजप नेते व पदाधिकाऱ्यांची माफी मागितली. 'तीन वर्षांपासूनच्या राजकीय प्रवासात भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांवर मी टीका केली असल्याने त्याबद्दल माफी मागतो, मुलगा समजून मला माफ करा,' असे आवाहन त्यांनी केले. तसेच 'विखे परिवार व कार्यपद्धतीचा इतिहास मांडून या अनुषंगाने 'स्वतःच सगळे चालवतात, विचारात घेत नाहीत,' अशा पद्धतीचा अपप्रचार माझ्याबद्दल विरोधकांकडून होणार आहे, पण माझी यापुढील वाटचाल युतीच्या संघटनात्मक रचनेनुसार असेल व सर्वांना योग्य तो मानसन्मान माझ्याकडून दिला जाईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या भाषणानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे, पाचपुते व अन्य नेत्यांनी, 'माफीनामा संपुष्टात आला असून विखेंना सर्वांनीच माफ केले आहे,' असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांकडून जबाबदारी : कर्डिले
'मी अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून आता भाजपमध्ये आलो असलो तरी येथे आल्याचा मागील १० वर्षांत मला कधीही पश्चात्ताप झालेला नाही,' असे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी स्पष्ट केले. 'नगर मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासात घेऊन माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी १०० टक्के पूर्ण करणार असून, डॉ. सुजय विखे महाराष्ट्रात एक नंबरने विजयी होतील,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाचपुतेंच्या कोपरखळ्या
या वेळी आगरकर, कदम, औटी, राजळे, प्रा. गाडे व अन्य वक्त्यांनी ताकद एकवटून नगर व शिर्डीच्या युतीच्या दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. 'राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थींच्या याद्याच आपण संकलित केल्या असून, या मंडळींशी संपर्क सुरू केला आहे,' असे औटी यांनी सांगितले. या वेळी पाचपुते यांनी 'पाणीप्रश्नावर यापुढे पुणेकरांची दादागिरी चालू दिली जाणार नाही,' असे स्पष्ट केले. कर्डिलेंना त्यांनी काही कोपरखळ्याही मारल्या. 'कर्डिलेंवर नगरची जास्त जबाबदारी आहे, देशाचे नेते नगरला राहणार आहेत, त्यामुळे आपली किंमत वाढली पाहिजे, शर्टच्या आत व वर असे काही करू नका, जे काही करायचे ते शर्टच्या वरच करा,' या त्यांच्या सूचक भाष्यामुळे हास्यकल्लोळ उडाला.
--
काँग्रेस जिल्हाध्यक्ष व्यासपीठावर
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी युतीच्या व्यासपीठावर रविवारी उपस्थिती लावली. 'डॉ. विखे यांना भाजपने उमेदवारी दिल्याबद्दल अंतःकरणपूर्वक आभार मानतो,' असे त्यांनी भाषणात सांगितले. 'काँग्रेसपेक्षा युतीची ताकद जिल्ह्यात निश्चितच जास्त आहे, डॉ. विखेंच्या उमेदवारीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे आम्ही बरेच प्रयत्न केले. पण आता मोकळ्या मनाने भाषणे करण्यास आम्ही मोकळे झालो आहोत,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
--