आमदार वैभव पिचड यांचे प्रतिपादन
अकोले : 'अकोले तालुका अतिदुर्गम, डोंगराळ असून तालुक्यात तीव्र दुष्काळ असताना सरकारने पटसंख्येअभावी शाळा बंद करणे अन्यायकारक आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. पटसंख्येअभावी तालुक्यातील एकही शाळा जिल्हा परिषदेने बंद करु नये, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल,' असा इशारा आमदार वैभव पिचड यांनी दिला.
जिल्हा परिषद चालवत असलेल्या शाळांपैकी पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण सचिवांनी दोन वर्षांपूर्वी घेतला होता. मागील वर्षी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा कमी पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या होत्या. चालू शैक्षणिक वर्षातही तशाच प्रकारे कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती सरकारने मागवली आहे. सरकारच्या सर्व्हेनुसार अकोले तालुक्यात कमी पटसंख्येच्या शाळा आहेत. अकोले तालुक्यातील शाळा डोंगराळ व अतिदुर्गम भागात असून वाडीवस्त्यांवर विखुरलेल्या आहेत. शाळेत जाण्यासाठी रस्तेही नाहीत. गावठाण व वाडीवस्तीवर असलेल्या या शाळा पटसंख्येअभावी जर बंद केल्या, तर या आदिवासी दुर्गम भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागेल. या भागातील वाडीवस्तीवरील मुलांना शाळेत जाण्यासाठी जंगलातून बरेच अंतर पायी जावे लागते. प्रमुख गावातील शाळांमध्ये जाताना तारेवरची कसरत करावी लागेल. जंगली श्वापदांपासून धोका होऊ शकतो. सरकारच्या या धोरणामुळे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची फरपट होणार आहे,' असे ते म्हणाले.