म. टा. प्रतिनिधी, नगर
कबड्डी...… कबड्डी...… म्हणत पॉइंट्स मिळवण्यासाठी सुरू असलेली खेळाडूंची धडपड, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला बाद करीत पॉइंट मिळाल्यानंतर करण्यात येणारा जल्लोष... अशा लाल मातीच्या मैदानावरील अस्सल मराठमोळ्या कब्बडी खेळातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील खेळाडूंचे नैपुण्य अनुभवण्याची संधी नगरकरांना मिळत आहे. निमित्त आहे गुरुवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे.
अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेने आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र राज्य किशोर/किशोरी अंजिक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला येथील रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या मैदानावर गुरुवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करण्यात आले व राज्याच्या विविध भागांतील २५ जिल्ह्यांतून आलेल्या संघाचे संचलन झाले. त्यानंतर स्पर्धेसाठी ५० पंचांची नेमणूक करण्यात आली.
या प्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आमदार अनिल राठोड, दादाभाऊ कळमकर, जी. डी. खानदेशे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नांवदे, आस्वाद पाटील , सचिन भोसले, मंगल पांडे, प्रा. शशिकांत गाडे, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, दिलीप सातपुते, संभाजी कदम आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक कबड्डी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी केले. त्यानंतर प्रत्यक्षात कबड्डीच्या सामन्यांचा थरार सुरू झाला.
२५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी सहा मैदाने तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे एकाच वेळी सहा सामने सुरू होत असून, हे सर्व सामने प्रकाशझोतात होणार आहेत. स्पर्धेत नगर जिल्ह्यासह कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, धुळे, जळगाव, जालना, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, पालघर, पुणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि नाशिक या जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले आहेत.
......