नगर : वीज बिल रद्द करून पुन्हा तोडलेले विद्युत कनेक्शन जोडून देण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. श्रीगोंदा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
श्रीगोंदा शहरातील एका इलेक्ट्रिक मोटार दुरुस्तीच्या दुकानाचे लाइट बील फेब्रुवारी २०१९ पासून महावितरणला प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे संबंधित दुकानाचे विद्युत कनेक्शन तोडून दुकान मालकास ३५ हजार ६० रुपयांचे बील देण्यात आले होते. हे बील रद्द करून तोडलेले विद्युत कनेक्शन पुन्हा जोडून देण्यासाठी महावितरणचे तंत्रज्ञ संदीप सोपान फुलवर व कंत्राटी तंत्रज्ञ अनिल साहेबराव तवले यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाचेची रक्कम शनिवारी (१२ ऑक्टोबर) संबंधित दुकानदाराकडून स्वीकारताना संदीप फुलवर व अनिल तवले यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने पकडले. पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शाम पवरे, दिपक करांडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल तन्वीर शेख, सतिश जोशी, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, हारून शेख, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.