नगर : राज्य सरकारच्या पन्नास कोटी वृक्षलागवड योजनेत नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आतापर्यंत ३० लाख २६ हजार रोपेलागवड केली आहे. जिल्हा परिषदेस ४२ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यातील जवळपास १ हजार ३१२ ग्रामपंचायतींनी ३० लाख रोपेलागवड केली आहे.
जिल्ह्यात यंदा १ कोटी १८ लाख रोपे लागवड केली जाणार आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून आतापर्यंत ५८ लाख रोपे लागवड करण्यात आली आहे. या विभागास ६२ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच या विभागांचे उद्दिष्ट पूर्ण होत आले आहे. जिल्हा परिषदेकडूनही जिल्ह्यात रोपेलागवड केली जात आहे. सुरुवातीच्या काळात ग्रामपंचायतींकडून याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु, आता मात्र ३० लाख रोपे लागवड पूर्ण करण्यात आली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंत रोपे लागवड करता येणार आहे. त्यामुळे आणखी दीड महिना मुदत आहे. या काळात रोपे लागवड करून या रोपांची देखभाल व संरक्षणही करावे लागणार आहे. रोपांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना पाणी देणे तसेच पाळीव प्राण्यांपासून संरक्षणासाठी रोपांभोवती ट्री गार्ड लावणे आवश्यक आहे. रोपांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा या आधी अनुभव आहे. त्यामुळे यंदा ग्रामपंचायती काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
--
ट्री गार्ड मिळेनात
रोपांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ग्रामपंचायतींना ट्री गार्ड देण्यात येणार आहेत. या ट्री गार्डसाठी आधी पाच लाख रुपये तरतूद होती. त्यानंतर मात्र या तरतुदीत वाढ करण्यात आली. ट्री गार्डसाठी आता दहा लाखांची तरतूद केली आहे. असे असले तरी ग्रामपंचायतींना मात्र अद्याप ट्री गार्ड मिळालेले नाहीत.