द्विवेदी यांनी दिले अतक्रिमणे हटविण्यासाठी नियोजनाचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, नगर
महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिका आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्रिस्तरीय आराखडा तयार केला आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ, पोलिस संरक्षण, डंपर्स, ट्रक व अन्य साहित्याच्या नियोजनाच्या सूचना त्यांनी बुधवारी अतिक्रमणविरोधी पथकाला दिल्या. या पार्श्वभूमीवर, नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण केलेल्यांनी स्वतःची अतिक्रमणे स्वतःच काढून टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
आठवडाभरापूर्वी महापालिकेचे पदाधिकारी व जिल्हाधिकारी द्विवेदी यांची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीतील निर्णय़ानुसार झालेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्य़ासाठी द्विवेदी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या वेळी शहर व शहर हद्दीतील अतिक्रमणे हटविण्यासाठी त्रिस्तरीय आराखडा त्यांनी जाहीर केला. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातून जाणारे महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवरची अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. त्यानंतर शहराच्या अंतर्गत भागातील मुख्य रस्त्यांवरची आणि नंतर उपनगरातील अतिक्रमणे हटवण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेनुसार आवश्यक नियोजन करण्याचे आदेश त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांना दिले. या बैठकीस सहायक जिल्हाधिकारी प्राजित नायर, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त प्रदीप पठारे व ज्योती कावरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपआरोग्याधिकारी पैठणकर, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, नाना गोसावी, अंबादास सोनवणे, अशोक साबळे आदींसह करनिरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
रोज वसुली करा
आयुक्त द्विवेदी यांनी या वेळी चारही प्रभाग अधिकाऱ्यांकडून संकलित कर थकबाकी वसुलीचा आढावा घेतला. मागील १५ दिवसांत चारही प्रभाग समित्यांनी ३ कोटी रुपयांची थकबाकी वसुली केली आहे; मात्र, मोठ्या थकबाकीदारांकडील थकबाकी तातडीने वसूल करण्याची गरज मांडताना, यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. थकबाकी वसुली झाली तर शहराचे प्रश्न पन्नास टक्के कमी होतील व विकासाला निधी उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. थकबाकी वसुलीची मोहीम दैनंदिन सुरू ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताच्या सूचना
शहर अस्वच्छ करणाऱ्या, रस्त्यावर किंवा मोकळ्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या आणि शहर विद्रूप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश द्विवेदी यांनी दिले. यासाठी विशेष पथकांद्वारे शहराच्या सर्वच भागात गस्त सुरू ठेवण्याबाबतही सुचवले. याशिवाय, शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यादृष्टीने आवश्यक कायदेशीर व अन्य कारवाईचेही आदेश दिले. पावसाळ्यात साथीचे आजार बळावू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करा तसेच ज्या निवासी अथवा व्यावसायिक इमारतीत पाणी साचून साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत असेल, तर अशा इमारतींच्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या १२ व २४ वर्षांच्या कालबद्ध पदोन्नतीसह इतर नियमित पदोन्नतीबाबतही तत्काळ कार्यवाहीच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आठवडाभरात सुनावणी
शहरात ९ चौक वाहनमुक्त, ९ रस्त्यांवर 'पे अँड पार्क' व ३४ ठिकाणी पार्किंग झोन करण्यात येणार आहे. यासंदर्भात नागरिकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत आलेल्या हरकतींची एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश त्यांनी नगर रचना विभागास दिले.
'दिल्लीगेट'वर चर्चा नाही
नगर शहरात दिल्लीगेट वेस पाडण्यासह दिल्लीगेट-जुनी महापालिका ते जीपीओ आणि दिल्लीगेट-चितळेरोड-तेलीखुंट-अशोका हॉटेल रस्त्यांचे प्रस्तावित रुंदीकरण सध्या चर्चेत आहे; मात्र, या विषयांच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झालीच नाही. केवळ शहरातील मिरवणूक मार्गावर महावितरणद्वारे सुरू असलेल्या भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामाबाबत आवश्यक सूचना महावितरण अधिकाऱ्यांना देण्याची ग्वाही द्विवेदी यांनी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
---