म. टा. प्रतिनिधी, नगर
जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकिल संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीमध्ये खटला पूर्व व न्यायालयात प्रलंबित प्रकरणे अशा तीन हजार प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रकरणे निकाली निघाली आहेत. आर्थिक प्रकरणांमध्ये तब्बल २२ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
शनिवारी (१४ डिसेंबर) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रधान न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, न्यायधीश ए. एम. शेटे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सुनीलजीत पाटील, वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे, उपाध्यक्ष अॅड. सुहास टोणे उपस्थित होते. लोकअदालतीमध्ये काही फौजदारी, दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यासाठी पॅनेल बसविण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये मोबाइल कंपन्या, महावितरण, बँका, पतसंस्थांची प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यात न्यायालयात प्रलंबित असलेले १६ हजार ६४१ प्रकरणे लोक न्याय़ालयात ठेवण्यात आले होते. यातील १ हजार ६३७ प्रकरणांमध्ये तडजोडी झाल्या आहेत. त्यातून १४ कोटी २३ लाख रुपयांची वसुली झाली. तर ९ हजार ७६८ खटलापूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील तडजोडीने १ हजार ४९१ प्रकरणांचा निपटारा झाला आहे. त्यातून ७ कोटी ७५ लाख रुपयांची वसुली झालेली आहे. प्रलंबित व खटलापूर्व असे २६ हजार प्रकरणांपैकी ३ हजार १२८ प्रकरणांचा निपटारा निघून २२ कोटी रुपयांची वसुली झालेली आहे.