म. टा. प्रतिनिधी, पाथर्डी
दसऱ्याच्या दिवशी भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या घाट सावरगाव येथे मेळावा घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा घाट राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी घातला आहे. असे असले तरी या भव्य स्मारकामुळे घाट सावरगावचा चेहरामोहरा बदलण्यासही सुरूवात झाली आहे. भविष्यात हे गाव मोठे पर्यटनस्थळ नावारूपास येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्यास स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सुरूवात करत गडाचे महत्व राज्याच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित केले. मुंडे यांचे निधन झाल्यानंतर ही प्रथा पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली. मात्र, पंकजा मुंडे यांच्याशी मतभेद झाल्याने भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडावर भाषणबंदी केली. त्यामुळे मागील वर्षी भगवान गडावर होणारा मेळावा भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या घाट सावरगाव येथे घेण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला. घाट सावरगाव येथे जरी भगवानबाबांचा जन्म झाला असला तरी बाबांचे जन्मस्थळ एवढीच या गावाची ओळख होती. मात्र, या गावात भगवानबाबांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेत कामाला सुरूवातही केली आहे. भव्य स्मारकामुळे भविष्यात भगवानबाबांच्या भक्तांची मोठी गर्दी येथे होऊ शकते. या ठिकाणी असलेल्या अडीच एकर जागेवर भगवानबाबांचे भव्य स्मारक उभारण्यास सुरवात झाली आहे. या अडीच एकरमध्ये नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बनवलेली भगवान बाबांची २५ फूट उंच मूर्ती दसऱ्याच्या दिवशी बसवली जाणार आहे. भगवान बाबानी आपल्या कार्यकाळात पाण्यावर बसून ज्ञानेश्वरीचे पारायण केले होते.
असे असेल स्मारक
दसऱ्याच्या दिवशी भगवानबाबांची जी मूर्ती सावरगाव येथील स्मारकात बसविण्यात येणार आहे. ती पाण्यावर तरंगणारी असणार आहे. स्मारकाचा पूर्ण आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी ६४ बाय ६४ फूट आकाराचे गोलाकार जलाशय बनवण्यात आले आहे. या जलाशयात सुमारे दोन लाख १७ हजार ६४० लिटर पाणी जमा करण्यात आले आहे. या जलाशयाच्या खाली एक ध्यान मंदिर सुद्धा उभारण्यात आले असून या ध्यान मंदिरात एकाच वेळी ३०० साधक ध्यानधारणा करू शकणार आहेत. या स्मारकाच्या पुढे व मागील बाजूस भव्य गार्डन उभारण्याचे काम चालू झाले आहे. या कामाचे भूमिपूजन बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी ३१ ऑगस्ट रोजी केले आहे. या स्मारकाचा आराखडा नगरचे आर्किटेक्ट मनोज जाधव यांनी तयार केला असून हे काम चोंडी येथील अहल्यादेवी होळकर यांचे स्मारक बनविणारे पुणे येथील ठेकेदार बाळासाहेब भुकन हे करत आहेत. या ठिकाणी भगवानबाबांची जी मूर्ती बसविण्यात येणार आहे, त्या मूर्तीवर कोणतेही छत्र उभारण्यात आलेले नाही. ऊन, वारा व पावसाचा कोणताही परिणाम या मूर्तीवर होणार नाही. ही मूर्ती प्रमोद कांबळे यांनी बनवलेली आहे. जो रंग विमानांना दिला जातो, तो रंग या मुर्तीला देण्यात आला आहे. स्मारक परिसरात असलेल्या अनेक बोअरला सध्या पाणी नसले तरीही स्मारकाच्या लगत असलेल्या बोअरवेलला सध्या तरी चांगले पाणी आहे. बगिचासह हे स्मारक जेंव्हा पूर्णपणे अस्तित्वात येईल, तेंव्हा या गावाला पर्यटनस्थळाचे स्वरूप येऊन परिसराच्या विकासाला मोठ्याप्रमाणावर चालना मिळेल अशी आशा गावकरी व्यक्त करीत आहेत.