अ‍ॅपशहर

शिर्डीतील पालखी सोहळा पुन्हा स्थगित; विश्वस्त आणि भाविकांमध्ये नाराजी

खबरदारी म्हणून अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा फटका शिर्डीतील पालखी सोहळ्याला बसला आहे. हा सोहळा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Mar 2022, 11:52 am
अहमदनगर: करोना काळात बंद असलेला शिर्डीतील गुरुवारचा पालखी सोहळा गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आला होता. मात्र, दुसऱ्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे कारण सांगून तो तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. संस्थानने अचानकपणे हा निर्णय घेतल्याचे सांगून भाविकांसह काही विश्वस्तांनीही नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात २२ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याने या पालखी सोहळ्यासोबतच रंगपंचमीनिमित्त निघणारी रथयात्राही रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shirdi Saibaba Temple
शिर्डीत पालखी सोहळा पुन्हा स्थगित, विश्वस्त आणि भाविकांची नाराजी


वाचा: संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

जिल्हाधिकाऱ्यांनी १४ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार २२ मार्च २०२२ पर्यंतचे उत्‍सव, साईबाबांची गुरुवारची पालखी व रंगपंचमी निमित्ताने निघणारी रथयात्रा मिरवणूक पुढील आदेश येऊपर्यंत स्‍थगित राहणार असल्‍याची माहिती शिर्डी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली आहे. या काळातील सण-उत्सव आणि करोना पतिबंधक उपाययोजनांसाठी मदत व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश दिला आहे. त्याचा फटका शिर्डीतील उत्सवांनाही बसला आहे. यावरून आता नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.
प्रत्येक गुरुवारी द्वारकामाई ते चावडी तसेच चावडी ते साईसमाधी मंदिरापर्यत पालखी काढण्यात येते. करोना काळात तब्बल दोन वर्षे ती बंद होती. गेल्या आठवड्यातच संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे आणि विश्वस्त मंडळ तसेच प्रशासनासोबत ग्रामस्थांशी चर्चा होऊन हा पालखी सोहळा पुन्हा सुरू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच गुरूवारी तो पुन्हा बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे ग्रामस्थ आणि भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंबंधी विश्वस्त सचिन गुजर म्हणाले की, ‘प्रतिबंधात्मक आदेश असले तरी नियम पाळून हा सोहळा करता येऊ शकतो. सरकारने आता विश्वस्त मंडळ स्थापन केले आहे, त्यामुळे प्रशासनाने असे निर्णय विश्वस्तांना विश्वासात घेऊन घेतले पाहिजेत.’

वाचा: ऊस तोडताना जुळविला विवाह, लग्नही झाले; पण अडीच महिन्यांनंतर...

शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर म्हणाले, ‘आता करोनाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्यामुळे त्या कारणासाठी पालखी सोहळा रद्द करणे योग्य नाही. साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी यानिमित्त साईभक्तांना मिळते. त्यामुळे गुरुवारी शिर्डीत गर्दी असते. मात्र, ऐनवेळी हा निर्णय घेतल्याने भक्त नाराज झाले आहेत. याची पुरेशी पूर्वकल्पना दिली जाणे आवश्यक होते.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज