अ‍ॅपशहर

जिल्ह्यातील दोन शाळा ठरल्या ‘स्वच्छ’

शालेय विद्यार्थ्यांत स्वच्छतेच्या सवयी रुजवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ योजनेत जिल्ह्यांतील दोन शाळा पात्र ठरल्या आहेत. नगर तालुक्यांतील नेप्ती व श्रीगोंदा तालुक्यातील उंडेमळा या दोन प्राथमिक शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर झाला असून येत्या एक सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ऑडिटोरिअम येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहेत.

Maharashtra Times 20 Aug 2017, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two school award for cleanness
जिल्ह्यातील दोन शाळा ठरल्या ‘स्वच्छ’


शालेय विद्यार्थ्यांत स्वच्छतेच्या सवयी रुजवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ योजनेत जिल्ह्यांतील दोन शाळा पात्र ठरल्या आहेत. नगर तालुक्यांतील नेप्ती व श्रीगोंदा तालुक्यातील उंडेमळा या दोन प्राथमिक शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर झाला असून येत्या एक सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ऑडिटोरिअम येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहेत. शाळेतील पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तणूक बदल व क्षमता विकास, हात धुण्याची व्यवस्था या पाच घटकांची केंद्रीय पथकाने पाहणी करुन शाळांची निवड केली आहे.

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २०१४ मध्ये या योजनेची सुरुवात केली. मागील २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत जिल्ह्यांतील शहरी भागातील ३६ आणि ग्रामीण भागातील २८५ शाळांनी वरील पाच घटकांची माहिती वेबसाइटवर अपलोड केली. त्यानंतर या शाळांची तालुकास्तर, जिल्हा स्तर व राज्य स्तरावरील समित्यांनी पाहणी केली. शाळांनी भरलेल्या माहितीनुसार शाळेत सुविधा आहेत, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. राज्य समितीच्या पाहणीनंतर केंद्राच्या दोन सदस्यांच्या पथकानेही जिल्ह्यांत येऊन या शाळांची पाहणी केली. शाळेतील मुलांसाठी हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशन आहे. परंतु, शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या पाहता एकाच वेळी विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी नळ आहेत का, अपंग मुलांना खुर्च्यांची व्यवस्था आहे का याबाबींचीही पाहणी करण्यात आली. या पाहणीत नेप्ती शाळेने ८९.५ टक्के गुण मिळवून देशात चौथा क्रमांक पटकावल्याचे शाळेतील शिक्षक आबा लोंढे यांनी सांगितले. तर या पाहणीत श्रीगोंदा तालुक्यातील उंडेमळा शाळेने ८३ टक्के गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्हीही शाळा जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील शाळा आहेत. शहरी भागातील ३६ शाळांनी या योजनेत सहभाग घेऊनही एकाही शाळेस पुरस्कार मिळवता आला नाही. दरम्यान, या पुरस्कारांचे दिल्लीत वितरण होणार असल्याने पुरस्कार स्वीकारण्यासाठी शाळेतील एक शिक्षक व एक विद्यार्थी पाठवला जाणार आहे. या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्याचा खर्च सरकारकडून केला जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज