अ‍ॅपशहर

दोन तरुणांनी शाळकरी मुलाला कारमध्ये लिफ्ट दिली, मात्र घर जवळ येताच...; धक्कादायक घटना समोर

Ahmednagar Police Updates : दोन तरुण त्यांच्या मोटारीतून काष्टीकडून अजनूज गावाकडे जात होते. रस्त्यात त्यांना एक शाळकरी मुलगा भेटला. त्याला घरी सोडण्यासाठी त्यांनी गाडीत घेतले होते.

Authored byविजयसिंह होलम | Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2022, 7:30 pm
अहमदनगर : राज्यात मुले पळवणारी टोळी नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, संशयावरून मारझोड करून नका, असं आवाहन पोलीस करत असले तरी प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडीत आज दुपारी असाच एक प्रकार घडला. मुले पळवणारे समजून दोन तरुणांना ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत ग्रामस्थांसोबत त्या दोघांचीही चूक असल्याचे पुढे आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ahmednagar police updates
अहमदनगर पोलीस


पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांपैकी एक जण पारनेर तालुक्यातील तर दुसरा श्रीगोंदा तालुक्यातीलच आहे. हे दोघे त्यांच्या मोटारीतून काष्टीकडून अजनूज गावाकडे जात होते. रस्त्यात त्यांना एक शाळकरी मुलगा भेटला. त्याला घरी सोडण्यासाठी त्यांनी गाडीत घेतले. त्याच्या घराजवळ आल्यावर गाडी थांबवली. मात्र, त्यांनी मुलाकडे पैसे मागितले. पैसे नाही दिले तर पुढे घेऊन जाऊ असं सांगत घाबरवले. यातून गैरसमज वाढत गेला. त्या मुलाने याची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली. पाहता पाहत गावभर माहिती पसरली आणि जमाव जमला. जमावाने त्या दोघांना मारहाण करत त्यांच्या वाहनाची तोडफोड केली.

याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक अभंग यांच्यासह अंकुश ढवळे, किरण बोराडे, प्रताप देवकाते, भरत इंगवले, रवि जाधव यांचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत करत सदर संशयितांना ताब्यात घेतले.

बच्चू कडूंनी खरंच कानशिलात लगावली? अखेर थेट कार्यकर्त्यालाच घेऊन सर्वांसमोर आले...

मिळालेल्या माहितीनुसार हे तरूण स्थानिकच आहेत. त्यांच्या चौकशीत ते मुलाला केवळ गंमत म्हणून घाबरवत असल्याचे पुढे आलं आहे. मात्र, त्यांनी तसे केल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. शिवाय त्यांच्या वाहनाबद्दल पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

भाजपमध्ये पंकजा मुंडेंना संपवण्याचे कारस्थान, त्यांनी राष्ट्रवादीत यावं; पंकजांना खुली ऑफर

यासंबंधी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील निरीक्षक रामराम ढिकले यांनी सांगितलं की, यातील दोघेही आरोपींनी मद्यापान केले होते. त्यांनी रस्त्यात सुरुवातील तीन व्यक्तींना लिफ्ट दिली. त्या बदल्यात त्यांच्याकडून प्रत्येकी दहा रुपये घेतले. ते उतरल्यानंतर पुढे तीन शाळकरी मुले भेटली. त्यांनाही गाडीत घेतले. त्यांच्याकडेही दोघांनी पैसे मागितले. मुलांकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी दोघांना उतरविले व एकाला गाडीतच ठेवले. गाडीतील मुलाने आरडाओरड केली. त्यामुळे बाजूचे लोक धावत आले. मुलाला पळून नेण्याचा प्रयत्न असल्याच्या संशयावरून त्यांनी सुरुवातीला जाब विचारला. उद्धट उत्तरे मिळाल्याने माराहाण सुरू झाली. जमाव वाढत गेला. आरोपींच्या गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी होती. पूर्वी ही गाडी एखाद्या अधिकाऱ्याकडे असावी. टोल वाचविण्यासाठी त्यांनी ती तशीच ठेवली असावी. या प्रकरणी पोलिसांना दोन गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र शासनाची पाटी वापरून फसवणूक केल्याबद्दल त्या दोघा तरुणांविरुद्ध तसंच मारहाण, तोडफोड केल्याबद्दल ग्रामस्थांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हरिभाऊ दत्तु वाळुंज (वय २७ वर्ष, रा. पिंपळगाव तुर्क, ता. पारनेर) आणि नासीर गुलाब पठाण (वय २८ वर्ष, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जिल्हा- अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज