अ‍ॅपशहर

खेतेवाडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी खेटे

खेतेवाडी गावातील महिलांना, मुलांना पाण्यासाठी सात किमी पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे. या गावाला जाण्यासाठी असलेला रस्ताही उखडला असून येथील ७५ कुटुंबांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Maharashtra Times 24 Jun 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water shortage in khetewadi
खेतेवाडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी खेटे


तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खेतेवाडी येथे महिनाभरापासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. पंचायत समितीच्या टंचाई निवारण विभागाला कळवून व ठराव देऊनही पाण्याचा टँकर उपलब्ध न झाल्याने गावातील महिलांना, मुलांना पाण्यासाठी सात किमी पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे. या गावाला जाण्यासाठी असलेला रस्ताही उखडला असून येथील ७५ कुटुंबांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी खेतेवाडीतील पाणीटंचाईसंदर्भात तातडीने टंचाई निवारण अधिकारी ताठे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्या वेळी, आम्ही टँकरसाठी १५ दिवसांपूर्वीच प्रस्ताव पाठविला असून त्यांचे उत्तर आले नाही, असे ताठे यांनी सांगितले. केळीला टँकर का बंद आहे, असे विचारले असता, तो बंद पडला असून लवकरच पाऊस सुरू होईल, असे मोघम उत्तर ताठे यांनी दिले. मागील वर्षी या गावात अशुद्ध पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ सुरू झाली होती. त्यामुळे यंदा मागणी करूनही अधिकारी टँकर पुरवत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सरकार बालमजुरीबाबत कठोर भूमिका घेत असताना येथील छोटी मुले डोक्यावर हांडे घेऊन पाण्यासाठी पायपीट करीत आहेत. तर काही मुले आजारी पडल्या आहेत.

याबाबत डॉ. लहामटे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांना कळवून वस्तुस्थिती विशद सांगितली. प्रशासनाने लवकरच टँकर देण्याचे मान्य केले आहे, असे त्यांनी सांगितले. या गावची लोकसंख्या ३०० असून गावात जायला असलेला रस्ताही खराब झाला आहे. तर पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे टँकरशिवाय पर्याय नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज