म. टा. वृत्तसेवा, पाथर्डी तालुक्यातील २१ गावांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व प्रताप ढाकणे यांनी केले तर आंदोलनात जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला शिरसाठ, अनुराधा कराळे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, तालुका प्रमुख रफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, माऊली केळगंद्रे, गहिनीनाथ शिरसाठ, बंडु बोरुडे, सीताराम बोरुडे आदी सहभागी झाले होते. तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून टँकर मिळावेत, असे प्रस्ताव अनेक गावांतून आले असले तरीही पंचायत समिती व महसूल प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे हे प्रस्ताव मंजूर होण्यास विलंब होत असल्याने संतप्त झालेल्या नेतेमंडळींनी २० गावांतील सरपंचासह तहसीलदार सुनीता जऱ्हाड यांच्या दालनात सोमवारी धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी त्यांच्या दालनातच भजने म्हणण्यास सुरुवात केली. आंदोलनाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या जऱ्हाड कार्यालयात आल्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मागणी केलेल्या वीस गावांना तातडीने टँकर सुरू केल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. जऱ्हाड यांनी या विषयावर गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके यांच्याशी चर्चा करून तातडीने निर्णय घेऊ, असे सांगताच घोडकेंना येथेच बोलवा, असा आग्रह आंदोलकांनी धरल्यानंतर घोडके हेसुद्धा तहसील कार्यालयात आले. या नंतर जऱ्हाड यांनी घोडके व नायब तहसीलदार जयसिंह भैसाडे यांच्याशी चर्चा करून आज (मंगळवार) पासून मागणी केलेल्या वीस गावांत टँकर तातडीने सुरू केले जातील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आज टँकर सुरू केले नाहीत तर एकही टँकर तालुक्यात फिरकू दिला जाणार नाही, असा इशारा रफिक शेख यांनी दिला. चौकट ः प्रशासनात समन्वयाचा अभावआंदोलनाच्या मुद्द्यावरून तहसीलदार सुनीता जऱ्हाड या नायब तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करायच्या; मात्र, नंतर हा निर्णय अंमलात आणणे अशक्य असल्याचे नायब तहसीलदार भैसाडे हे जाहीर करत असल्याने प्रशासनातच एकवाक्यता नसल्याचे या वेळी दिसून आले.
|
आजपासून २१ गावांत टँकर
तालुक्यातील २१ गावांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Maharashtra Times 15 Mar 2016, 3:00 am