संवाद यात्रेचे नगरमध्ये स्वागत
नगर : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्याच्या भ्रमंतीवर निघालेल्या सर्वोदय मंडळाची संवाद यात्रा नुकतीच नगरमध्ये दाखल झाली. या यात्रेचे पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने अॅड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी स्वागत केले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करुन सशक्त भारत निर्मितीच्या उद्देशाने ही संवाद यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप नगरमध्ये झाला.
सर्वोदयचे आबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही संवाद यात्रा लोकसहभागातून सुरू आहे. यामध्ये डॉ. शिवचरणसिंह ठाकूर, जयवंत मठकर, सुभाष पाटील, चंद्रवीर सावळे आदी सहभागी झाले आहेत. नगरमध्ये नुकतीच पाथर्डी व नगर तालुक्यातील डोंगरगण येथे ग्रामसभा घेण्यात आली. ही संवाद यात्रा महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुंबई येथून निघाली असून, यात्रेचा समारोप पुणे येथे होणार आहे. महात्मा गांधींच्या विचारांची देशाला आज गरज आहे. महात्मा गांधी यांचे विचार समाजापुढे नेण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून केला जात आहे. तसेच महाविद्यालयीन युवक व शालेय विद्यार्थ्यामध्ये गांधींजींचे विचार रुजवण्याचाही उद्देश असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये या यात्रेचा पुढील टप्पा सुरू होणार आहे.