१३ जणांच्या भूमिकेकडे लक्ष; आज अर्ज माघारीनंतर मतदारसंघांचे चित्रही होणार स्पष्ट
म. टा. प्रतिनिधी, नगर
जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये विविध राजकीय पक्षांमध्ये बंडाळी उफाळून आली असल्याने 'बंडोबा' नेमके काय करणार? रिंगणात राहणार की रणछोडदास होणार? याची उत्सुकता वाढली आहे. भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या मिळून जिल्ह्यातील १३ बंडखोरांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोमवारी (७ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी ३ पर्यंत कोणकोणत्या मतदारसंघांतील बंडोबा रणछोडदास होतात व कोणत्या मतदारसंघात बंडाळी कायम राहते हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अर्ज माघारीनंतर प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांचे चित्रही स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांमध्ये मिळून १८९ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारी अखेरची मुदत असून या दिवशी विविध मतदारसंघांत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्या बंडोबांच्या भूमिकेकडेच लक्ष असणार आहे. पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीने नीलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विजय औटी उमेदवार असले तरी शिवसेनेचे जिल्हा परिषद संदेश कार्ले यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर पारनेर भाजपचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे झावरे, कार्ले व चेडे या तिघांची भूमिका उत्सुकतेची आहे. श्रीगोंद्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीने घनश्याम शेलार यांना उमेदवारी दिली आहे. पण जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनीही येथे अर्ज दाखल केला आहे तर कट्टर विखे समर्थक अण्णासाहेब शेलार यांचाही अर्ज आहे. खासदार डॉ. सुजय विखेंनी नागवडे व शेलारांशी चर्चा केल्याने येथील बंडखोरी रोखली जाणार असल्याचे बोलले जाते. पण प्रत्यक्षात सोमवारी दुपारी ३ नंतरच या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी दिली असली तरी या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व पाथर्डी भाजयुमोचे नेते अमोल गर्जे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांचे बंड थोपवण्याचे आव्हान राजळे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे. कोपरगाव मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. पण या मतदारसंघातून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवाय, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणेही रिंगणात आहेत. परजणे व वहाडणे यांनी माघार न घेतल्यास कोल्हे यांच्यासमोरील समस्या वाढण्याची शक्यता आहे. श्रीरामपूर येथे काँग्रेसमधून आलेले भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे; मात्र, या मतदारसंघातून डॉ. चेतन लोखंडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. अर्थात त्यांनी माघार घेत असल्याचे शनिवारीच स्पष्ट केले आहे व तसा अर्जही दिल्याचे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षातील ही प्रक्रिया सोमवारीच होणार आहे. याशिवाय येथे शिवसेनेकडून इच्छुक असलेले रामचंद्र जाधव यांचाही अर्ज आहे. त्यामुळे डॉ. लोखंडेंनी माघार घेतली तरी जाधव काय करणार, हा उत्सुकतेचा भाग असणार आहे. राहुरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिलेंविरोधात शिवसेनेचे गोविंद मोकाटे तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात अरुण तनपुरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे मोकाटे-तनपुरे यांचे अर्ज रिंगणात राहतात की नाही, यावर या मतदारसंघाच्या निवडणुकीची लढत कितपत रंगतदार होते, हे अवलंबून असणार आहे.
सहा मतदारसंघ बंडखोरमुक्त
अकोले, शिर्डी, संगमनेर, कर्जत-जामखेड, नेवासे व नगर शहर या मतदारसंघांमध्ये पक्षातून होणारे बंड रोखण्यात महायुती व आघाडी या दोघांना यश आल्याचे चित्र आहे; मात्र, नगर शहरात राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले किरण काळे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली आहे. अन्य मतदारसंघांत मात्र असे पक्षांतर करून बंडखोरीचा प्रकार घडलेला नाही. या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील अंतिम चित्र सोमवारी दुपारी स्पष्ट होणार आहे.
..........
दक्षिणेत काँग्रेस नाही
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने निम्म्यानिम्म्या जागा लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला निम्म्या जागा मिळालेल्या नाहीत. जिल्ह्यातील १२ जागांपैकी राष्ट्रवादीला ९ व काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजप प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती खालावली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात जिल्ह्यातीलच संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत; मात्र, जिल्ह्यामध्ये संगमनेर वगळता उत्तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व शिर्डी हे अन्य दोन मतदारसंघ काँग्रेसला जागा वाटपात मिळाले आहेत. जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये एकही मतदारसंघ काँग्रेसला मिळालेला नाही. कर्जत-जामखेडची त्यांना आशा होती, पण तोही मतदारसंघ राष्ट्रवादीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यासाठी घेतल्याने दक्षिणेत काँग्रेस नाही, असेच चित्र दिसत आहे.
.......