पालकमंत्री असंवेदनशील
अजीत पवार यांची टीका; पीडित कुटुंबाकडे फिरकलही नाहीत
म. टा. वृत्तसेवा, जामखेड
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. पालकमंत्र्यांच्या तालुक्यात दिवसा गोळ्या घालून माणसे मारली जातात तरी देखील पालकमंत्र्यांना घटनेचे गांभीर्य नाही. गोळीबाराच्या घटनेला चार पाच दिवस झाले तरी पालकमंत्री पीडित कुटुंबीयांकडे फिरकले नाहीत हे दुर्दैव आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
गोळीबाराच्या घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी, सायंकाळी भेट घेतली. ते म्हणाले, 'जिल्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. अतिशय क्रुरपणे हे दुहेरी हत्याकांड घडले असल्याने या घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हायला हवी. या दुहेरी हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा. पिडीत कुटुंबीयांच्या सदस्याला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संस्थेमध्ये नातेवाईकांना नोकरी देण्यात येईल. आर्थिक मदतही करण्यात येईल. गेल्या तीन चार महिन्यात जामखेड सारख्या ग्रामीण भागात सातआठ गुंडाच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. तालुक्यातील वाकी येथील गोळीबाराच्या प्रकरणातील आरोपींना अटक केली असती तर दुहेरी हत्याकांडाची घटना घडलीच नसती. अपराध करणारे राजरोसपणे बाहेर फिरत आहेत तर निरापराधांना आत टाकल जात आहे, अशी टीका देखील पवार यांनी पोलिस प्रशासनावर केली. दुहेरी हत्याकांडात कोणी राजकीय हस्तक्षेप करु नये म्हणून आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
या वेळी दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, डॉ. भास्कर मोरे, संजय वराट, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, हनुमंत पाटील, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, अमित जाधव, शरद शिंदे, नितीन धांडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित