नगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यासाठी येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला आहे. या महाविद्यालयात युवतींची 'वोट आर्मी' तयार करण्यात आली असून, त्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
महाविद्यालयात स्थापन केलेल्या या 'वोट आर्मी'चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, 'लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बहाल केला असून, त्याचा योग्य वापर करून प्रत्येकाला लोकप्रतिनिधी निवडता येतो. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वानी सहभागी होऊन मतदान करण्याची गरज आहे.' याप्रसंगी प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब औटी, प्रशांत साठे, जयश्री पठारे, मंगल भोसले, स्वाती माने उपस्थित होते.
महाविद्यालयात सुमारे ४५० युवती या 'वोट आर्मी'त सहभागी झाल्या आहेत. यामार्फत प्रा. सतीश शिर्के यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये माझे मत-माझी स्वाक्षरी, मतदान संकल्पपत्र, मानवी साखळी, पोस्टर स्पर्धा, मेरे देश का सेल्फी, २१ सेकंदांचा व्हिडिओ, मतदार जागृती फेरी, अशा विविध उपक्रमांचा सहभाग आहे. या आर्मीने तयार केलेल्या एक हजार ६०० मतदार जागृती संदेशपत्राचे वाटप तारकपूर बसस्थानकात प्रवाशांना केले; तसेच आतापर्यंत मतदानजागृती करणारे पंधरा हजार संदेश पाठवण्यात आले आहेत.
........