म. टा. प्रतिनिधी, नगर
जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. दुबार पेरण्या करण्याचीही वेळ आली आहे. चारा पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने भविष्यात चारा टंचाईची समस्या भेडसावू शकते. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी विनंती महसूल विभागाकडे करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, कृषी समिती सभापती अजय फटांगरे, समाजकल्याण समिती सभापती उमेश परहर, सदस्या हर्षदा काकडे आदी या सभेस उपस्थित होते.
जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाने ओढ दिली आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस पडला नाही. त्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. पिकांच्या उत्पादनात घट येणार आहे. चारा पिकांचेही उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यासाठी जिल्ह्यात चार छावण्या सुरू करण्याची विनंती महसूल विभागाकडे करण्याचे या सभेत निश्चित करण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत २३३ नवीन नळपाणी पुरवठा योजनांद्वारे ३५३ गावे, वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. यासाठी २७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.