अ‍ॅपशहर

VIDEO: पेटत्या निखाऱ्यावरुन चालण्याची शेकडो वर्षांची परंपरा; प्राचीन मंदिरात होते अग्नीपरीक्षा

Worshippers Walk On Fire In Akola: चक्क धगधगत्या निखाऱ्यावरुन अनवाणी चालण्याच्या प्रथा- परंपरा तुम्ही चित्रपटात पाहिल्या असतीलच. पण आपल्या महाराष्ट्रातही अशीच एक परंपरा पाळली जाते. अकोला जिल्ह्यातील या प्रथेविषयी जाणून घेऊया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jan 2023, 1:15 pm
अकोलाः जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या मळसुर गावातील एक परंपरा आगळी-वेगळी परंपरा पाळली जाते. ही प्रखा अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे. धगधगत्या निखाऱ्यांवरून चालण्याची ही परंपरा आहे. मळसूर गावात सुपीनाथ महाराजांचे एक प्राचीन मंदिर आहे. सुपीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी निखाऱ्यांवरून चालण्याची ही परंपरा पाळली जातेय. काल (सोमवारी) रात्री मळसुर गावात 'देवाचं लग्न' या उत्सवानिमित्त भक्तांकडून ही 'अग्नीपरीक्षा' देण्यात आली आहे. धगधगत्या निखाऱ्यांवरून चालतांना देवाला घातलेलं साकडं पुर्ण होतं, अशी येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम akola news


पातूर तालुक्यातील मळसूर या गावाचे ग्रामदैवत सुपीनाथ महाराज यांचे पुरातन मंदिर आहे. माघ महिन्यात या गावात सुपीनाथाची मोठी यात्रा भरते. या यात्रेत 'देवाचं लग्नं' लावण्याची प्रथा आहे. 'देवाच्या लग्ना'च्या अक्षता पडल्या की ही भाविकांकडून 'अग्निपरिक्षा' दिली जाते. यात लाकड्याच्या कोळशाच्या निखाऱ्यांवरून भाविक चालत जातात. गावकऱ्यांकडून शेकडो वर्षांपासून ही परंपरा पाळली जात आहे.


सुपीनाथ महाराजांच्या मंदिरातील 'अग्नीपरीक्षे'साठी सुरुवातीला खड्डा खोदण्यात येतो. त्यानंतर ग्रामस्थ खड्ड्यात लाकडे जाळतात. या जळालेल्या लाकडांमुळे तयार झालेल्या निखाऱ्यांची गावकऱ्यांकडून विधीवत पूजा केली जाते. त्यानंतर मग धगधगत्या निखाऱ्यांवरुन चालत भाविक पुढे जातात. विशेष म्हणजे, या तप्त निखाऱ्यांवरून चालल्यानंतर भाविकांना कोणतीही इजा होत नाही, अशीही भाविकांची श्रध्दा आहे. पती-पत्नीने जोडीनं सुपीनाथाकडे साकडं घालण्याची परंपरा आहे. मनातली इच्छा पुर्ण झाल्यावर जोडीनं सुपीनाथाप्रती कृतज्ञता म्हणून या अग्निपरीक्षेतून म्हणजेच लखलखत्या निखाऱ्यावर चालण्याची ही परंपरा आहेय.

वाचाः पठ्ठ्यानं करुन दाखवलं! शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला RTO इन्स्पेक्टर

मात्र धगधगत्या निखाऱ्यावर चालणं यात कोणताच चमत्कार नसल्याचं अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटतं. कारण जेव्हा आपण कुठल्याही आगीला अथवा निखाऱ्याला हात लावल्यास २ सेकंदापेक्षा जास्त स्पर्श टिकून राहला तरच त्याचा चटका जाणवतो. मात्र एका सेकंदात निखाऱ्याला किंवा आगीला हात लावून पटकन हात मागे ओढून घेतला तर त्याचा चटका जाणवत नाहीये, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.


या निखाऱ्यांवरून चालल्यानंतर लोकांना कोणतीही इजा पोहोचत नाही किंवा त्यांच्या पायाला चटके बसत नाहीत व ते सुरक्षित राहतात, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शरद वानखेडे यांनी दिली आहे. दरम्यान श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा ही फार पुसट आहे. श्रद्धेच्या अतिरेकातून अंधश्रद्धेचा जन्म होतो. पुरोगामी महाराष्ट्रानं आपलं पुरोगामित्व जपतांना अशा प्रथा, परंपरांकडे चिकित्सकपणे पहावं, एवढीच माफक अपेक्षा आहे, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातंय.

वाचाः मुंबईच्या व्यक्तीने इगतपुरीत संपवलं आयुष्य; हॉटेलच्या रुममध्येच...

महत्वाचे लेख