अ‍ॅपशहर

अपार्टमेंटच्या गच्चीवरुन पडल्याने मराठी साहित्यिकाचा जागीच मृत्यू

साहित्य क्षेत्रामध्ये मोठे नाव असलेले मार्तंडराव माळी आज (बुधवारी) सकाळी त्यांच्याच अपार्टमेंटच्या गच्चीवर फिरत असताना सर्व्हिस गल्लीमध्ये पडले. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Mar 2022, 6:03 pm
अकोला : साहित्य क्षेत्रामध्ये मोठे नाव असलेले मार्तंडराव माळी आज (बुधवारी) सकाळी त्यांच्याच अपार्टमेंटच्या गच्चीवर फिरत असताना सर्विस गल्लीमध्ये पडले. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे साहित्य क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. ते मराठा सेवा संघाचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता देखील काही जण व्यक्त करत आहेत. मात्र, यासंदर्भात अजून पर्यंत तरी पुष्टी होऊ शकली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra Akola marathi litterateur martandrao mali pass away
साहित्यिक मार्तंडराव माळी


शास्त्री नगर येथे राहणारे साहित्यिक मार्तंडराव माळी हे काही दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसल्यामुळे रुग्णालयात भरती होते. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना आठ दिवसांपूर्वी घरी आणलं होतं नित्यनेमाने ते दररोज सकाळी त्यांच्या अपार्टमेंटच्या गच्चीवर फिरायला जात होते. आजही ते सकाळी फिरायला गेले होते. मात्र, अपार्टमेंटच्या मागे असलेल्या सर्विस गल्लीमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. काही जणांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली आहे. काहींचं म्हणण्यानुसार चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर काहींनी त्यांनी आत्महत्या केल्याचा कयास लावला आहे.

मराठा सेवा संघाचे सक्रिय पदाधिकारी

मराठा सेवा संघाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून मार्तंडराव माळी यांची ओळख आहे. अनेक सेवा संघाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. मराठा सेवा संघाला संघटित करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे मराठा सेवा संघामध्ये त्यांची चांगली ओळख आहे. मार्तंडराव माळी यांच्या मृत्यूची वार्ता सर्वत्र पसरली. यानंतर मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.

साहित्यक्षेत्रात मार्तंडराव माळी यांचे मानाचे स्थान

अकोला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्याच्या साहित्य क्षेत्रामध्ये मार्तंडराव माळी यांचं नाव मोठं आहे. त्यांनी अनेक कवितेची पुस्तकं लिहिली आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना मानाचं स्थान आहे. त्यांच्या मृत्यूमुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

महत्वाचे लेख