अ‍ॅपशहर

कामगाराचा अपघाती मृत्यू; संतप्त जमावानं जाळला ट्रक

रेतीची वाहतूक करणार्‍या ट्रकने एका कामगाराला चिरडल्याची घटना आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास अमरावतीच्या जुना बायपास मार्गावरील चपराशीपुरा येथे घडली. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावानं ट्रक पेटवून दिला. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2020, 4:42 pm
अमरावती । प्रतिनिधी: रेतीची वाहतूक करणार्‍या ट्रकने एका कामगाराला चिरडल्याची घटना आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास अमरावतीच्या जुना बायपास मार्गावरील चपराशीपुरा येथे घडली. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावानं ट्रक पेटवून दिला. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Amravati


मनोज मुलचंद नायकवाड (वय ४०, रा. परिहरपुरा) असं अपघातात ठार झालेल्या कामगाराचं नाव आहे. मनोज नायकवाड हा परिसरातीलच एका मद्य विक्रीच्या दुकानात काम करीत होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी तो त्याच्या सायकलने घरी निघाला होता. रस्ता ओलांडत असताना बडनेराच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकनं त्याला धडक दिली. मनोज हा ट्रकच्या पुढच्या बाजूच्या चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.

वाचा: हिंगणघाट: पीडितेच्या कुटुंबाला १० लाखांची मदत

या घटनेनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. संतप्त नागरिकांनी ट्रकच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. यानंतर नागरिकांनी ट्रक पेटवून दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. महापालिकेचे अग्निशामक बंबही घटनास्थळी दाखल झाले. पेटत्या ट्रकवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. या सगळ्या घडामोडींमुळं जुन्या बायपास महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

वाचा: नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर काकाचा अत्याचार

वाचा: जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज