अ‍ॅपशहर

विद्यापीठावर राविकाँची धडक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील भोंगळ कारभार बंद करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थी शुक्रवारी विद्यापीठावर धडकले. विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेता कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर निवेदन स्वीकारण्यासाठी दालनाबाहेर आले.

Maharashtra Times 31 Dec 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amrawati university issue
विद्यापीठावर राविकाँची धडक


संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील भोंगळ कारभार बंद करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थी शुक्रवारी विद्यापीठावर धडकले. विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेता कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर निवेदन स्वीकारण्यासाठी दालनाबाहेर आले.

अमरावती विद्यापीठातील कार्यप्रणाली विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी केला होता. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर विद्यार्थ्यांना भेटत नसल्याचा आरोप करीत मोर्चाची हाक देण्यात आली होती. यानंतर शुक्रवारी शेकडो विद्यार्थी विद्यापीठावर धडकले. मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणा देण्यात आल्या. परीक्षा विभागातील मंद कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे अमरावती विद्यापीठाने दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या पाल्यांची परीक्षा शुल्क माफ करावे, विद्यापीठाचे धारणी येथे उपकेंद्र उभारावे, विद्यार्थ्यांच्या पुर्नमूल्यांकनात बदल झाल्यास पैसे परत करण्यात यावे कारण ती चूक विद्यापीठाची असते, सर्व परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात यावेत, उत्तरपत्रिका तपासणे प्राध्यापकांना बंधनकारक करण्यात यावे, माहिती पत्रकाचे शुल्क कमी करावे आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चेकरी विद्यार्थी विद्यापीठात धडकल्याची माहिती कुलगुरूंना देण्यात आली. मोर्चा कुलगुरूंच्या दालनाकडे जात असताना कुलगुरू डॉ. चांदेकर मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आले. निवेदन स्वीकारून त्यांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मोर्चामध्ये रायुकाँचे पदाधिकारी ऋषी वैद्य यांच्यासह, प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, उपाध्यक्ष निखील ठाकरे, जिल्हाध्यक्ष शुभम होले, आकाश हिवसे, ऋग्वेद देशमुख, अर्थव पांडे, शिवाजी बुरंगे, प्रथमेश बाभूळकर, अमोल पाटील, किरण अरबट यांच्यासह शेकडो विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज