अ‍ॅपशहर

उमेदवाराच्या विरोधाने चव्हाणांची सभा रद्द?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची आज, शनिवारी यवतमाळात प्रदेश काँग्रेसच्या आदेशाने सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या सव्वालाखे यांनी या सभेला विरोध केला. त्यामुळे सभा रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.

Maharashtra Times 26 Nov 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashok chawan in vidarbha
उमेदवाराच्या विरोधाने चव्हाणांची सभा रद्द?


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची आज, शनिवारी यवतमाळात प्रदेश काँग्रेसच्या आदेशाने सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या सव्वालाखे यांनी या सभेला विरोध केला. त्यामुळे सभा रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.

नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. पण, नेत्यांच्या सभामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांना प्रचार करता येत नाही. नेत्यांची वाट पाहात बसून राहावे लागते. सारे काही करूनही नेत्यांच्या भाषणाचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. अलीकडे खर्चही अमाप वाढला आहे. म्हणून यवतमाळ नगराध्यक्षपदाच्या काँग्रेस उमेदवार संध्या चव्हाण यांनी सभा घेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पूर्वनियोजित सभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या सव्वालाखे मोजक्याच कार्यकर्त्यांबरोबर शहर पिंजून काढत आहेत. दुसरीकडे सततच्या पराभवाचा धसका घेतलेले मोठे काँग्रेस नेते यवतमाळात प्रचारात दिसत नाही. पक्षाकडून योग्य ती रसद पोहचली नसल्याचीही चर्चा आहे.

मुख्यमंत्री आज यवतमाळात

यवतमाळ नगर परिषदेमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शनिवारी यवतमाळला येत आहेत. येथील पोस्टल ग्राउंडवर सायंकाळी ६ वाजता त्यांची सभा होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी दिली.

‘सत्तापालटाची सुरुवात अकोटमधून करू’

अकोला : सत्तापालटाची सुरुवात आकोटपासून करावयाची आहे. त्यासाठीच काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

अकोट येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराकरिता गवळीपुरा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, नोटाबंदी श्रीमंतांपेक्षा गरिबांना अडचणीची झाली आहे. निवडणुकीत वापरलेल्या पैशांची परतफेड करण्याकरिता नोटाबंदीचा उपयोग मोदींनी केला आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत, हमीभावाबाबत एक चकार शब्द बोलत नाहीत. शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्व गोलमोल बोलून जनतेची दिशाभूल करीत असल्याचेही ते म्हणाले. खासदार हुसेन दलवाई यांनी एमआयएमविरोधी तोफ डागून हे लोक दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करून मतविभागणी करण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. सभेला खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार सुधाकर गणगणे, रामदास बोडखे, लक्ष्मणराव तायडे, अजहर हुसेन यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादीला बगल

नगरपालिकेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची युती आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सर्व स्थानिक नेत्यांची नावे घेतली मात्र राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचे नाव घेतले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज