म. टा. प्रतिनिधी, अमरावती
एकविसावे शतक हे भारतासाठी महत्त्वाचे आहे. यात सर्वधर्माला एकत्र घेऊन चालणारी संस्कृती उदयास येणार आहे. विश्वबंधुभाव हा भारताच्या संस्कृतीचा पाया असल्यामुळे २१व्या शतकात भारत जगात महासत्ता म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी केले.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४८व्या पुण्यतिथी महोत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. यादरम्यान सामूदायिक ध्यानावरील चिंतन सत्रात ते बोलत होते. डॉ. भटकर म्हणाले, सुपर कम्प्युटर क्षणात गणिताच्या कोट्यवधी प्रक्रिया करतात. पण, त्याचे कार्य त्यामध्ये असणाऱ्या लाखो कम्प्युटरमध्ये सामावले असते. असेच कार्य राष्ट्रसंतांच्या सामूदायिक ध्यान व प्रार्थनेतून होते. जगामध्ये दहा हजार वर्षात अनेक संस्कृती उद्यास आल्या आणि लोप पावल्या. परंतु, भारतीय संस्कृती अजूनही जिवंत आहे. आम्ही त्याचे वारसदार आहो याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय संस्कृती ही वैश्विक संस्कृती आहे.
राष्ट्रसंतांनी गुरुदेवाच्या माध्यमातून विश्व बंधुभावाची संकल्पना पूर्वीच सांगितली आहे. प्रयत्न व प्रारब्ध, लौकिक व अलौकिक ह्या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. त्यामुळे प्रगती साधावयाची असल्यास प्रयत्न व प्रार्थना या दोन्ही बाबींचा समावेश करून हा भवसागर आपणास पार करावयाचा आहे. प्रयत्नांना प्रार्थनेचे बळ मिळाले तर प्रगती वेगाने होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. भटकर यांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे पूजन करून पुण्यतिथी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. सामुदायिक ध्यानानंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची शोभायात्रा व मानव सेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांचा टाळ पद्न्यास, लेझीम व दिंडी गुरुदेवनगरातून काढण्यात आली. यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचार प्रमुख बबनराव वानखेडे, डॉ. उद्धवराव गाडेकर, डॉ. रघुनाथ वाडेकर, डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, लक्ष्मणराव गमे, दामोदर पाटील, भानुदास कराळे, गुलाब खवसे, डॉ.राजाराम बोथे, नीळकंठ हळदे, विलास साबळे उपस्थित होते.
आज महोत्सवात खंजेरी
राष्ट्रसंतांनी आपल्या खंजेरी भजनाच्या माध्यमातून जनजागृती करून १९४२मध्ये ‘चले जाव’चे आवाहन केल्याने चिमूर, आष्टी, यावली या ठिकाणी गुरुदेवभक्तांनी स्वातंत्र्याचे आंदोलन पेटविले होते. याच खंजेरी भजनाचा निनाद या पुण्यतिथी महोत्सवामध्ये होणार आहे. भजन हे भक्ती व शक्तीचे माध्यम असल्याने राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रसंतांची खंजेरी भजने, स्पर्धाही होतात. या सर्वांचा एकत्रित मेळ घालण्यासाठी या पुण्यतिथी महोत्सवात खंजेरी भजन संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे भजन दोन सत्रामध्ये दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय सकाळी ५ वाजता सामुदायिक ध्यान व चिंतन, सकाळी ७ वाजता योगासन व प्राणायाम, सकाळी ८.३०ला ग्रामगीता प्रवचन, सकाळी १० ते ५ खंजेरी भजन संमेलन, सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना व चिंतन, रात्री गुरुदेव बाल भजन मंडळ यांचे खंजेरी भजन, रात्री ८.३० वाजता कीर्तन होईल.