म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद तसेच जालना जिल्ह्यात वनमहोत्सवात वन विभागाने लावलेल्या रोपट्यापैकी सुमारे ९२ टक्क्यांहून अधिक रोपटी जिंवत आहेत. वन विभागाने केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली. रोपट्यांचे जतन व संवर्धनासाठी कसोशीने प्रयत्न केले जात असल्याने वृक्षारोपण यशस्वी झाल्याचे विभागाने नमूद केले आहे.
राज्यात एक जुलै ते सात जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. यात औरंगाबाद जिल्ह्यात १२ लाख तर जालना जिल्ह्यात सहा लाख ५० रोपांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी साडेपाच हजार रोपांची लागवड करण्याची जबाबदारी एकट्या वनविभागाकडे देण्यात आली होती. उर्वरित रोपे विविध शासकीय विभाग तसेच ग्रामपंचायतींच्या मदतीने लावले जातील, असे नियोजन करत संबंधित विभागानाही टार्गेट देण्यात आले होते. दरम्यान, वन विभागाने औरंगाबाद जिल्ह्यात पोखरी, दुधड, गोलटगाव, जयपूर, करंजगाव, जांभई, अब्दीमंडी यासह अन्य अशा ४६४ हेक्टर क्षेत्रावर तीन लाख ९९ हजार ७५२ रोपट्यांची लागवड करण्यात आली होती. यापैकी किती रोपटे जगली याची पाहणी नुकतीच करण्यात आली. त्यात तीन लाख ६५ हजार ८९३ म्हणजेच ९२ टक्के रोपटे जिंवत असल्याचे आढळून आले.
अन्य विभागाची माहिती नाही
जतन, संवर्धनबाबत कर्मचाऱ्यांनी कसोशीने केलेल्या प्रयत्नामुळे रोप जगण्याचे प्रमाण वाढल्याचे उप वन संरक्षक सतीश वडस्कर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. दरम्यान, जालना जिल्ह्यात लावलेल्या ७१ हजार ३०० पैकी ६४ हजार ६४० रोपटे आता चांगली वाढली असून, अन्य विभागाने लावलेल्या रोपट्यांपैकी किती जिंवत आहे, याची माहिती अद्याप समजू शकली नाही.