\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\Bकेंद्र शासनाने जाहीर केलेला वीज बिल कायदा २०२० आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या निषेधार्थ महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणामधील कर्मचारी आणि अभियंत्यांनी सोमवार (१ जून) काळा दिवस म्हणून पाळला. औरंगाबाद शहर, ग्रामीण, जालनासह राज्यभरातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमधील विविध संघटनांनी एकत्र येऊन केंद्र शासनाने लॉकडाऊनच्या काळात वीजबिल अधिनियम २०२० मंजूर केला. तसेच वीज कंपन्यांचेही खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होणार आहे. तसेच राज्य शासनाचेही अधिकार बाधीत होत असल्याचा आरोप वीज कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात एक जून रोजी शहर, ग्रामीण आणि जालनामधील वीज कर्मचारी अभियंत्यांनी काळा दिवस पाळला. काळ्या फिती लावून काम केले. ज्या ठिकाणी करोनाबाधित क्षेत्र नाही, अशा ठिकाणी निषेध सभाही घेण्यात आल्या. या आंदोलनात वीज तांत्रिक कर्मचारी महासंघाच्या सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला नाही.
……
केंद्र शासनाने घेतलेल्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात आम्ही आंदोलन पुकारले आहे. वीज कर्मचारी अधिकारी कृती समितीच्या बैठकीत पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे. निश्चित लढा चालू राहणार आहे.
\B- सय्यद जहिरोद्दीन सदस्य, वीज कर्मचारी अधिकारी संघटना कृती समिती …\B