म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यातील पालोद शिवारात २६ मेंढ्यांचा चाराच्या विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे मेंढपाळाचे आर्थिक नुकसान झाले आहे. आणखी २० ते २५ मेढ्यांची परिस्थिती गंभीर आहे.
पालोद येथील शेतकरी गणेश साबळे गट क्रमांक सहा मधील शेतात मागील दोन-तीन दिवसांपासून मेंढपाळानी मेंढ्यांचे आखर ठोकले होते. परंतु, रविवार व सोमवार रोजी सकाळी भोवळ येऊन काही मेंढ्या कोसळल्याने मेंढपाळात धांदल उडाली. परतीच्या पावसामुळे मका व इतर पिके जागेवर उगवल्याने चारा खराब होऊन त्याच्यात बुरशी तयार झाली व तो चारा मेंढ्याच्या खाण्यात आल्याने त्या विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मेंढपाळाना मात्र पुढील उपचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.
काभू सुंदर साबळे, पालोद (१५), लक्ष्मण कोंडिबा दांगोडे अंधारी (सहा), साहेबराव दांगोडे पालोद (सहा), या मेंढपाळाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पालोदचे सरपंच गजानन पालोदकर, ग्रामविकास अधिकारी जयदीप सुरसे, अमोल पालोदकर, अनिल पालोदकर, सुरेश उघडे, काशिनाथ चाथे, प्रभाकर काटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी अन्वी येथिल पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन परीवेक्षक डॉ. अनिल राठोड यांच्याशी संपर्क साधला. राठोड व रामजी मोरे यांनी पंचनामा, मेंढ्यांचे शवविच्छेदन करून पुढील प्रक्रिया पूर्ण केली.
\Bपशुसंवर्धन विभागाकडून आवाहन\B
मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी आदींचा चारा जनावरांचे मुख्य खाद्य म्हणुन वापर केला जातो. गेल्या महिन्यात परतीच्या पावसामुळे सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भिजलेल्या पिकांना जागेवर अंकुर फुटत आहेत. चारा सतत पावसात पडून राहिल्याने विषबाधीत बुरशी (असिडोसीस) तयार होते. त्यामुळे जनावरांना विषबाधा होऊन मृत्यू होतो. अशा प्रकारचे नवीन अंकुराचा चारा व पावसात जास्त भिजलेला चारा जनावरांना देवू नये, असे आवाहन अन्वी येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. अनिल राठोड यांनी केले आहे.