म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील २०६ वसाहतींमध्ये करोनाच्या आजाराने शिरकाव केला आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वसाहतींमधील १४८२ बाधित व्यक्तींपैकी त्यापैकी १०६८ जण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळत आहे.
शहरात करोनाचे रुग्ण वाढत असले तरी करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या वसाहतींपैकी ११८ वसाहतींमधील २५ हजार १५९ घरांचे सर्वेक्षण व त्यातील ४५४ आरोग्य पथकांनी एक लाख १९ हजार ७४९ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. या वसाहतींमध्ये जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. सध्या ८८ वसाहतींमधील सर्वेक्षणाचे काम बंद करण्यात आले आहे. या वसाहतींमधील चौदा दिवसांचा सर्वेक्षणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. २०६ वसाहतींपैकी ९६ वसाहतींमध्ये प्रत्येकी एकच रुग्ण आढळला आहे. काही वसाहतींमध्ये हा रुग्ण देखील करोनामुक्त झाला आहे. प्रामुख्याने दाट लोकवस्ती असलेल्या भागातच बाधितांची संख्या जास्त आहे.