म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत तालुक्यातील दोन लाख ६९ हजार लाभार्थींना १३५ टन तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक सदस्यांला पाच किलो तांदूळ देण्यात येणार असून, या महिन्यातील वाटप सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी दिली.
'लॉकडाऊन'मुळे केंद्र शासनाने मोफत तांदूळ वाटप करण्याचा निर्णय घेत गरीब कुटुंबांना मोठा दिलासा दिला. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा तालुक्यातील तब्बल दोन लाख ६९ हजार लाभार्थींना लाभ मिळणार आहे. प्राप्त तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप करण्यात आला असून, लाभार्थींना वाटप सुरू करण्यात आलेले आहे. 'लॉकडाऊन'मुळे अनेक कुटुंब मोठ्या अडचणीत सापडलेले आहे. त्यात हातावरील कुटुंबांचे तर मोठे हाल होत आहे. अनेकांनी मदतीचे हात पुढे करीत अन्नधान्य, किराणा सामानाचे वाटप ही केले.
आतापर्यंत ४० टक्के लाभार्थींना तांदूळ वाटप करण्यात आले आहे. २० एप्रिलपर्यंत सर्वांना वाटप करण्याचे नियोजन आहे. सर्व पात्र लाभार्थींना याचा लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थींनी फक्त गर्दी करू नये, 'सोशल डिस्टंन्सिंग'चे नियम पाळावेत. या योजनेचा लाभ मिळाला नसल्यास, त्यांनी पुरवठा विभागाकडे तक्रार करावी.
- रामेश्वर गोरे, तहसीलदार, सिल्लोड